‘आपले पालम’ ग्रुपच्या वतीने धरणे आंदोलन; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
पालम : पालम शहर आणि तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पूर्णपणे वाहून गेले असून, निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आपले पालम’ या व्हाट्सअॅप ग्रुपच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी, २९ सप्टेंबर २०२५ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दसरा आणि दिवाळीसारखे सण जवळ आल्यामुळे, शेतकऱ्यांना सण साजरा करता यावा यासाठी त्यांच्या बँक खात्यावर त्वरित अनुदान जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी आंदोलकांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयामार्फत पाठवले. केवळ पंचनामे न करता, पालम तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांना सरसकट कर्जमाफी, प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि विद्यार्थ्यांची फीस माफ करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच, या अतिवृष्टीमुळे पालम तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत करावी आणि ज्या शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत, त्यांनाही भरीव मदत करावी, अशी मागणी निवेदनात आहे. पालम तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला नाही, तर ग्रुपच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.





