पुण्याच्या ‘सेवावर्धिनी’ चा पुढाकार, संस्थेच्या टीमने केली पाहणी, ग्रामस्थांशी साधला संवाद
सेलू : अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सेवावर्धिनी सेवाभावी संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वालूर येथील प्राचीन हेलीकल स्टेप वेल व बारदानी बारवेला नुकतीच भेट देऊन त्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत ग्रामस्थांशी प्राथमिक बोलणी करून सकारात्मक चर्चा केली. या टीममध्ये सेवावर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा पुणे येथील रोहन बिल्डर्सचे मालक सुहास लुंकड, कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, प्रकल्प अधिकारी प्रसाद देशपांडे, समन्वयक अमोल काटीकर यांचा समावेश होता. त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेसाठी राजेश साडेगावकर, मारुती बोडखे, गणेश मुंढे, शंतनू पाठक, स.ना. अन्सारी, इस्माईल सेठ अन्सारी, अभियंता आशिष निलावार, सचिन विहिटकर, मल्हारीकांत देशमुख उपस्थित होते. बाजार समितीचे संचालक शैलेश तोष्णीवाल यांनी टीमचे स्वागत केले.सुहास लुंकड यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास डिसेंबर महिन्यात आमची टेक्निकल टीम येऊन आराखडा तयार करेल, असे सांगितले.
बारवाची मोहर पोस्टकार्डवर

छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ.सुनील भोकरे, सेलूच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, सरपंच संजय साडेगावकर, शैलेश तोष्णीवाल यांच्या पुढाकाराने मे २०२२ मध्ये ६८ ग्रामस्थांनी दोन दिवसांत श्रमदानातून बारव स्वच्छ केली आणि संवर्धन कार्याने गती घेतली. दीपोत्सवाने बारवाचे सौंदर्य आणखी उजळले. जागतिक वारसा दिनानिमित्त टपाल खात्याने जारी केलेल्या पोस्टकार्ड व आंतर्देशीय पत्रावरदेखील १८ एप्रिल २०२३ रोजी वालूर येथील प्रसिद्ध कुंडलाकार ‘हेलीकल स्टेपवेल’ ची मुद्रा झळकली आहे. याचा लाईन डायग्राम छत्रपती संभाजीनगर पुरातत्व विभागाचे समन्वयक मयुरेश खडके यांनी तयार केलेला आहे. महाराष्ट्र बारव पुनर्जीवन मोहिमेचे संस्थापक तथा समन्वयक रोहन काळे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
राष्ट्रीय विचाराची संस्था
सेवावर्धिनी ही राष्ट्रीय विचारांची संस्था असून या संस्थेची स्थापना १९९८ मध्ये मुंबई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. समाजातील दुर्बल घटकांना सबल करून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करते. कोणत्याही कामासाठी सेवावर्धिनी सरकारकडून व सरकारच्या कोणत्याही अभिकरणाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेत नाही. देशातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या आर्थिक सहाय्यावर अशी कामे केली जातात. संस्था सध्या नेवासे जि. नगरच्या पिचडगाव येथील ९०० वर्षांपूर्वीच्या बारवेचे पुनरुज्जीवन करीत संस्था करीत असल्याची माहिती कार्याध्यक्ष सुहास लुंकड यांनी दिली.
अहिल्याबाई होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत राज्यातील इतिहासतज्ज्ञ, विचारवंत या सेवावर्धिनी संस्थेशी संलग्न आहेत. संस्थेने पश्चिम महाराष्ट्रातील १७ बारवांचे पुनरुज्जीवन पूर्ण केले असून २०२६ च्या जूनपर्यंत ३८ बारवांचे काम पूर्णत्वास जाणार आहे. संस्थेने निवडलेली वालूर ही मराठवाड्यातील एकमेव बारव आहे. – सोमदत्त पटवर्धन, कार्यवाह, सेवावर्धिनी
गावकऱ्यांनी श्रमदानातून रात्र रात्र जागून दोन्ही बारवा स्वच्छ केल्या, तळमळीने संवर्धनासाठी पुढाकार घेतला. परंतु सरकार-प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने बारव दुरुस्तीसाठी कुठलाही निधी दिला नाही. गावकरी नाराज झाले होते. परिणामी बारवाची पडझड होऊ लागली. त्यामुळे पुन्हा बारव बुजून टाकण्याचा विचार होऊ लागला. परंतु सेवावर्धिनीची संपूर्ण टीम २५ ऑक्टोबर २०२५ रोजी गावात आली आणि हा ऐतिहासिक वारसा जतन होणार आहे. याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. – संजय साडेगावकर, सरपंच, वालूर





