गर्दी टाळण्यासाठी जालना जिल्ह्यात इंधन विक्रीवर तात्पुरती मर्यादा, अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रशासनाचे आवाहन
सेलू जि.परभणी : ” उद्या पासून पंप बंद होणार ” अशी अफवा सेलू ( जि.परभणी ) शहरात पसरली. गुप्ता पंपावर टॅंकर आलेले असताना, वाहन चालकांनी पेट्रोलसाठी बुधवारी, २५ मार्च रोजी रात्री आठ वाजता गर्दी केली होती. तर परभणी रोडवरील पंपावरही रांगा लागल्या होत्या. डिझेलसाठीही वाहनांच्या रांगा दिसून आल्या. शहरातील अन्य दोन पंप स्टॉक नसल्याने बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिस गर्दी पांगवण्यासाठी परिसरात उपस्थित होते. दरम्यान, ही केवळ अफवा असून भरपूर स्टॉक उपलब्ध आहे, असे पंप संचालक राजेश गुप्ता यांनी सांगितले.
दुचाकीला २०० तर चारचाकीला २००० रुपयांपर्यंतच मिळणार इंधन
पेट्रोल पंपांवरील गर्दी टाळण्यासाठी जालना जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश; जिल्हा प्रशासनाचे अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन
जालना : जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी इंधन विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ( पुरवठा विभाग) २५ मार्च रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २०० रुपये तर तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २००० रुपयांपर्यंतच इंधन दिले जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास कडक मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे आणि पंपांवरील रांगा टाळाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.या काळात रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यामध्ये प्राधान्य दिले जाईल. तसेच प्रत्येक पेट्रोल पंप धारकाला त्यांच्याकडे उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागातील फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार कडक कारवाई केली जाणार आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे जालना जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी आदेशात म्हटले आहे.





