शेतकऱ्यांना ३५० कोटींची मदत मिळवून दिल्याचे रघुनाथ गावडे यांचे प्रतिपादन
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम गुरुवारी (दिनांक २८) रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, आणि महसूल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी रघुनाथ गावडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, हा कार्यक्रम खूप भावपूर्ण आहे. शासकीय सेवेत काम करत असताना अनेक ऋणानुबंध निर्माण होतात. गावडे आणि माझी ओळख शासकीय सेवेत येण्यापूर्वीची असून आम्ही चांगले मित्र आहोत. गावडे यांनी नाशिक कुंभमेळ्यात उत्कृष्ट काम केले असून त्यांचे आतापर्यंतचे प्रशासकीय कामकाज उल्लेखनीय आहे.
रघुनाथ गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत दोन ‘ट्रिगर’ लागू करण्याचा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळवून दिली. याच काळात ‘शासन आपल्या दारी’, ‘महासंस्कृती’, ‘महानाट्य’, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पूर्ण करता आल्या. परभणी जिल्हा कायम माझ्या स्मरणात राहील, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, गावडे यांच्या दोन वर्षांच्या काळातील अनुभव पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जिपराज डापकर, शैलेश लाहोटी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, राजेश सरोदे, महसूल संघटनेचे उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप राजपुरे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रवीण वायकोस यांनी केले.





