सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानमालेत पक्षनिरीक्षक माणिक पुरी यांचे प्रतिपादन
सेलू जि.परभणी : मराठी साहित्यविश्वात निसर्गावर ललित लेखन करून त्याला एक वेगळा सन्मान मिळवून देणारे लेखक म्हणजे पद्मश्री अरण्यॠषी मारुती चितमपल्ली आहेत. त्यांनी आयुष्यातील एक तृतीयांश वेळ जंगलसाधना आणि संशोधन करून हे लेखन करत निसर्गविषयक लेखन समृद्ध करण्यात मोलाचे योगदान दिले आहे, असे मत पक्षी निरीक्षक आणि निसर्गलेखक माणिक पुरी यांनी व्यक्त केले
सेलू येथील नूतन विद्यालयात आयोजित ६४ व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात ते बोलत होते. “पद्मश्री अरण्यॠषी मारुती चितमपल्ली ” हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे होते, तर माणिक पुरी आणि आदर्श शिक्षक माधव गव्हाणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याविषयी बोलताना माणिक पुरी म्हणाले की, वनविभागात नोकरी करत असताना त्यांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. जागतिक पक्षीतज्ञ डॉ.सलीम अली यांच्या सहवासातून त्यांच्या या निरीक्षणाला आणि संशोधनाला योग्य दिशा मिळाली. प्रा.नरहर कुरुंदकर आणि गो. नी. दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही संशोधने ललित स्वरूपात लिहिली. त्यांच्या या साहित्यनिर्मितीमुळे महाराष्ट्राला निसर्ग आणि पक्ष्यांवर संशोधन करून लिहिणारा एक उत्कृष्ट लेखक मिळाला. त्यांनी १७ लेखसंग्रह, एक पक्षीकोश आणि ‘मृग-पक्षीशास्त्र’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद करून वाचकांसाठी प्रचंड साहित्य निर्माण केले आहे.
माधव गव्हाणे यांनी ‘जंगलाचं देणं’ या पुस्तकाचा संदर्भ देत मारुती चितमपल्ली यांनी गाव-खेड्यांच्या आसपास आढळणाऱ्या चिंचेच्या झाडांचे विशद केलेले महत्त्व पटवून दिले. केवळ चिंचेचेच नव्हे तर पिंपळ, वड आणि कडूलिंब यांसारखी झाडे गावांची शोभा होती. मात्र, काळानुसार ही झाडे नष्ट केली जात असल्याने जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात विजय ढाकणे यांनी, पक्षीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मारुती चितमपल्ली यांनी विविध संस्कृत आणि पाश्चात्त्य भाषा शिकल्या, यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर आणि मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन उपेंद्र बेल्लूरकर यांनी केले, तर संयोजक संजय विटेकर, सहसंयोजक जी.ए.गुंजकर, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, अजित मंडलिक आणि बाळू बुधवंत यांनी सहकार्य केले.





