मिशन प्राणाचे प्रमुख ध्रुव साकोरे यांचे मत, बोर्डीकर महाविद्यालयात कार्यक्रम
सेलू : पारंपरिक कापूस-सोयाबीन शेतीत मेहनत जास्त असूनही नफा कमी असल्याने तरुण वर्ग शेतीकडे पाठ फिरवत आहे. अशा परिस्थितीत मिशन प्राणा ग्लोबर्क सोल्युशन आणि अॅग्रो रेंजर्स यांच्या माध्यमातून मिश्र फळबाग हा शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम पर्याय असल्याचे मत मिशन प्राणाचे प्रमुख ध्रुव साकोरे यांनी व्यक्त केले आहे.
शुक्रवारी, २९ ऑगस्टरोजी सेलू येथील तालुका कृषी विभाग, मिशन प्राणा आणि बोर्डीकर कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या काळ्या सुपीक जमिनीला आणि जीवनदायिनी गोदावरी, दुधना, करपरा, पूर्णा नद्यांच्या पाण्याला जगभर मान्यता असतानाही शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी का राहते? असा प्रश्न उपस्थित करत मिशन प्राणा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच एक नवी दिशा दाखवेल, असा विश्वास श्री.साकोरे यांनी व्यक्त केला.
श्री साकोरे म्हणाले, “आजच्या शेतकऱ्याचा संघर्ष उद्याच्या पिढीचे भविष्य घडवेल. मिश्र फळबाग ही केवळ शेतीतील एक नवी क्रांती नसून, ग्रामीण भारताच्या समृद्धीचे बीज आहे.” प्रत्येक शेतात आंबा, पेरू, मोसंबी, चिकू अशा ४-५ प्रकारच्या फळझाडांची लागवड केल्यास एका पिकावर अवलंबून राहावे लागणार नाही. नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल.मिश्र फळबागेमुळे कार्बन शोषण होऊन वैज्ञानिक प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे राष्ट्रीय बाजारपेठेत फळांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढेल. या उपक्रमातील सर्व खर्च सी.एस.आर. फंडिंग आणि शासकीय योजनांतून केला जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प खर्चात हा नवा मार्ग उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “जय जवान, जय किसान, जय विज्ञान” या घोषणेला प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य मिशन प्राणा करत असून, हा उपक्रम शेतीला नवा श्वास, तरुणांना नवी आशा आणि देशाला नवा मार्ग दाखवेल, असा विश्वास ध्रुव साकोरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला शेतकरी, कृषी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





