सेलू येथील विवेकानंद विद्यालयात सत्रांत बैठक
सेलू : विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत शिक्षकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर असतो आणि विद्यार्थी अनुकरणीय असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची क्षमता, सृजनशीलता तसेच सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी सेलू येथील विवेकानंद विद्यालयात ‘१५’ ऑक्टोबर रोजी आयोजित सत्रांत बैठकीत बोलताना केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी होते. उपेंद्र बेल्लूरकर, करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.डॉ. हेमंत वैद्य पुढे बोलताना म्हणाले की, शाळेचा इतिहास हा शिक्षकांच्या त्याग आणि समर्पण यावर लिहिला जातो. शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करावा. तसेच, पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात. शाळेचा आणि समाजाचा आंतरक्रिया घडवून आणावी. शिक्षकांनी कार्यकर्त्याची भूमिका निभवावी आणि मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करून अपेक्षित वर्तन बदल करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बैठकीच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सत्रात मूल्यमापन, स्पर्धा परीक्षा अहवाल, विविध विषय अहवाल आणि बालवाडी अहवाल यांचा आलेख मांडण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन साळवे यांनी केले, प्रास्ताविक शंकर शितोळे यांनी केले, तर आभार करुणा कुलकर्णी यांनी मानले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि सेवक वर्ग यांनी प्रयत्न केले.





