नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचे प्रतिपादन; के.बा.विद्यालयात परितोषिक वितरण सोहळा उत्साहात
सेलू | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या जडणघडण व व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आवश्यक असतात, असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी परितोषिक वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.
येथील के. बा. विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे परितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध जोशी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रसिद्ध उद्योजक महेशराव खारकर, संस्थेचे सदस्य ॲड. किशोर जवळेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके व संजय धारासुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. यावेळी बोलताना मिलिंद सावंत म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला तरच भविष्यात खरी प्रगती होत असते. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांचा खरा विकास होत असतो. त्यांनी भविष्यात कोणतेही सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ॲड.जोशी यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी कृष्णा पांचाळ, मंगेश कुलकर्णी व किशोर खारकर यांनी यादी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले तर सर्जेराव सोळंके यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे सदस्य रामेश्वर राठी, डॉ. प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, अशोक खताळ यांची उपस्थिती होती.
दरम्यान, सकाळच्या सत्रात प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना परितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य डॉ. प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर, विष्णू शेरे, ललित बिनायके, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनील गायकवाड तसेच मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके व संजय धारासुरकर यांची उपस्थिती होती. सुचिता पितळे व कीर्ती कुलकर्णी यांनी यादी वाचन केले. सूत्रसंचालन शुभांगी भाग्यवंत यांनी केले तर नामदेव क्षीरसागर यांनी आभार मानले.





