अक्रूर महाराज साखरे यांचे प्रतिपादन, पांगरी येथील अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन सेवेला भाविकांची मोठी गर्दी
जिंतूर : समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारी व्यक्तीच समाजाच्या स्मरणात कायम राहते. संत परंपरेने दिलेला सदाचार, भक्ती आणि मानवतेचा वारसा पुढे नेण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन अक्रूर महाराज साखरे यांनी केले.
पांगरी (ता. जिंतूर) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या कीर्तन सेवेत ते बोलत होते.संत निळोबाराय यांच्या अभंगाचा संदर्भ देत त्यांनी भक्ती आणि परोपकाराचे महत्त्व विषद केले. देवाला कर्मकांडापेक्षा भक्ताचे शुद्ध प्रेम आणि निस्वार्थ सेवा प्रिय असते. ज्या व्यक्तीच्या मनात दृढ श्रद्धा आणि सकारात्मक विचार असतो, त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो, असे त्यांनी “भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती” या ओळींचे स्पष्टीकरण देताना सांगितले. देव केवळ मंदिरापुरता मर्यादित नसून तो भक्ताच्या शुद्ध भावनेत आणि दैनंदिन जीवनात वास करतो, असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.समाजप्रबोधन करताना अक्रूर महाराज साखरे यांनी समाजातील अनिष्ट प्रथांवरही भाष्य केले. इतरांच्या यशावर जळण्याऐवजी त्यांच्या चांगुलपणाचे कौतुक करण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्त्री भ्रूणहत्येसारख्या प्रथांना आळा घालून समाजात समानतेचा विचार रुजवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या कीर्तन सोहळ्याला पांगरी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





