नामदेव महाराज चारठाणकर यांचे प्रतिपादन
सेलू : नाम, भक्ती आणि ज्ञान या सर्वांमध्ये नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे, कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात नामातूनच होते. वेद, सृष्टीची उत्पत्ती आणि जगातील सर्व व्यवहार हे नामातूनच होत असतात, म्हणून नामाने देह पुण्यवान होतो, असे प्रतिपादन हभप नामदेव महाराज चारठाणकर यांनी केले. येथील अलंकापुरी नगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी सांगता सोहळ्यातील कीर्तनाचे पहिले पुष्प गुंफताना गुरुवार १२ मार्च रोजी सकाळी ते बोलत होते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘पवित्र तो देह वाणी पुण्यवंत’ या अभंगावर विवेचन करताना ते म्हणाले की, नामाचे महत्त्व अगाध आहे. नामधारकाच्या पायाखालील मातीसाठी साक्षात भगवान त्यांच्या पाठीमागे चालतात, त्यामुळे नाम घेणाऱ्यांना इतर कोणत्याही साधनेची गरज उरत नाही. नामानेच ईश्वराची प्राप्ती होते. ज्यांच्या हृदयात अखंड भगवंताचे नाम आहे, तो देह तीर्थस्वरूप असून त्याची वाणी पुण्यवान समजावी. नामाचे चिंतन केल्याने सर्व दोष नष्ट होतात. ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र सर्व साधनांचे सार असून, देवाचे नाव घेतल्याने अंत:करण शुद्ध होते आणि संतांचे दर्शन घडते, असे हभप नामदेव महाराज चारठाणकर यांनी स्पष्ट केले.
शहरातील अलंकापुरी नगरीत पंडित महाराज डाके यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाभारत आणि ज्ञानेश्वरीचा समन्वय सांगताना हभप चारठाणकर महाराज म्हणाले की, महाभारत जर आंब्याचे झाड असेल, तर ज्ञानेश्वरी त्यातील मधुर रस आहे. हा ज्ञानामृत रस गावागावात पोहोचवण्याचे हभप पंडित महाराज डाके यांचे कार्य अत्यंत मोठे आहे.
सोहळ्याच्या नियोजनाबद्दल बोलताना त्यांनी एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीचा आधार घेत भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांची सोय व्हावी यासाठी सर्वांनी सेवाकार्यात खारीचा वाटा उचलावा, असे ते म्हणाले. या सोहळ्यातील कीर्तनाची पहिली सेवा म्हणजे केवळ पत्रावळ असून, यापुढील प्रत्येक कार्यक्रम म्हणजे ज्ञानाचे पक्वान्न असणार आहे, असे सांगत त्यांनी आपल्या रसाळ वाणीने भाविकांना मंत्रमुग्ध केले.





