श्रावण मास, स्वातंत्र्य दिन, नागपंचमी व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम (फुलचंद भगत ): श्रावण मास, स्वातंत्र्य दिन, नागपंचमी आणि ईद-ए-मिलाद या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) (३) अन्वये संपूर्ण वाशिम जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
हा प्रतिबंधात्मक आदेश १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या विविध कृतींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
शस्त्रे व घातक वस्तू बाळगण्यास मनाई
आदेशानुसार तलवार, भाला, दंडा, लाठी, काठी, सुरा तसेच इजा करण्यासाठी वापरता येतील अशा तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे फेकण्यासाठी वापरता येतील अशी साधने जवळ बाळगणे, जमा करणे अथवा तयार करणे यावरही निर्बंध आहेत.
प्रक्षोभक घोषणा, फलक व मिरवणुकांवर निर्बंध
सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक घोषणा, आवेशपूर्ण भाषणे, किंकाळ्या किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृती करण्यास मनाई आहे. तसेच प्रक्षोभक चिन्हे, चित्रे, फलक किंवा वस्तू तयार करणे, त्यांचा प्रसार अथवा प्रचार करण्यावरही प्रतिबंध राहणार आहे.या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे तसेच मिरवणूक काढण्यासही निर्बंध राहणार आहेत.कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, विवाह समारंभ व अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांना हा आदेश लागू राहणार नाही.
नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे
सण-उत्सव शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.सण उत्सवांचा आनंद शांततेत साजरा करा; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.





