वाशिम (फुलचंद भगत) : जल हे जीवनाचा आधार असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे.जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
मातीचे संवर्धन, पाण्याची बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांमध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश कृतीतून पुढे न्यावा. युवकांनी रील्स स्पर्धेत सहभागी होऊन मृद व जलसंवर्धनाचा संदेश समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.यावेळी ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच उपस्थितांनी मृद व जलसंधारणाची शपथ घेत जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. माती आणि पाण्याचे संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून, या लोकचळवळीत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.





