जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची माहिती, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग; पाथरी उपविभागात लष्कराची तुकडी दाखल होणार
परभणी : परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी आणि इतर नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. सध्या जायकवाडी आणि माजलगाव धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. धोका पातळी गाठल्यास नागरिकांनी सुरक्षितस्थळी जावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
केले आहे.
लष्करी आणि एनडीआरएफ पथक तैनात
पाथरी उपविभागात संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन, छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय लष्कराची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे. मेजर कमाल यांच्या नेतृत्वाखाली ही तुकडी लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे. तसेच, खबरदारी म्हणून एनडीआरएफचे पथक उपलब्ध करून देण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.
धरणे पूर्ण क्षमतेने भरली
परभणी जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना ही धरणे, तसेच ढालेगाव, तारुगव्हान, मुद्गल, दिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे निम्न व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकल्पांतून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, गोदावरी, पूर्णा, दुधना आणि त्यांच्या उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत.
यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, परभणी जिल्ह्यासाठी दिनांक २३ आणि २५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सुरक्षितस्थळी राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२४५२-२२६४०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर तसेच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्याशी ९९७५०१३७२६ किंवा ७०२०८२५६६८ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





