शेतपिके, फळबागांचे प्रचंड नुकसान, नागरी वसाहतीतील घरांमध्ये पाणी शिरले, नागरिकांची तारांबळ
परभणी : जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १२३.४ टक्के पाऊस झाला असून, १ जून ते आजपर्यंत एकूण ९५७.०६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३४.०६ मि.मी. पाऊस झाला असून १२ मंडळात अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे.
परभणी जिल्ह्यातील परभणी, पालम, पूर्णा आणि सोनपेठ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहाच्या अहवालानुसार १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पहाटे चारच्या सुमारास काही मंडळांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, रविवारी सायंकाळी तसेच सोमवारी पहाटे पावसाने झोडपून काढले.
सोमवारी सकाळी पावणे साडे दहापर्यंत परभणी जिल्ह्यात सरासरी ३४.६ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी तालुक्यामध्ये ४ मंडळांत अतिवृष्टी झाली असून, त्यात परभणी ६८.८, पेडगाव येथे ७२.०, जांब येथे ६८.३ आणि टाकळी कुंभकर्ण ८६.५, गंगाखेड तालुक्यात महातपुरी ७२.३ आणि माखणी ६६.५, पूर्णा तालुक्यात लिमला ६६.३ आणि चुडावा ६८.५ मिलिमीटर पाऊस झाला. पालम तालुक्यात पालम ७६.० आणि पेठशिवणी ९९.३ या दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक अतिवृष्टीची नोंद झाली असून आवलगाव येथे ११२.३ आणि वडगाव येथे ८१.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासांत तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस मिलिमीटरमध्ये : परभणी ५४.७, गंगाखेड ४३.७, पाथरी १६.७, जिंतूर ५.७, पूर्णा ५०.४, पालम ५०.९, सेलू २.७, सोनपेठ ६१.९, मानवत ३०.८
रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटे पर्यंत परभणी शहरासह परिसरात ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने दिलेल्या तडाख्याने मध्यवस्तीसह चौहो बाजूंच्या सखल भागातील वसाहतीतून ओढ्या नाल्यांप्रमाणे पुराचे पाणी वाहत होते. हजारो घरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे मुलाबाळांसह आबालवृद्धांना तसेच संसार उपयोगी साहित्य व किंमती वस्तू घेऊन त्या सुरक्षित स्थळी हलविण्याकरीता कुटुंबीयांची मोठी तारांबळ उडाली. पाऊस थांबेपर्यंत हजारो कुटुंबीय अक्षरशः जीव मुठीत घेऊन सुरक्षितस्थळी थांबण्याच्या प्रतीक्षेत होते. शेकडो नागरिकांची घरदारे, संसार उपयोगी साहित्यांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे.





