लक्ष्मण गाडेकर यांचे प्रतिपादन
सेलू : येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयात २९ जुलै रोजी आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमात लक्ष्मण गाडेकर यांनी आसाराम लोमटे यांच्या ‘वाळसरा’ कथासंग्रहावर आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर होते. गाडेकर म्हणाले की, बदलत्या काळानुसार ग्रामीण समाजव्यवस्था बदलली आहे. स्वार्थी, आत्मकेंद्री कार्यकर्त्यांमुळे ग्रामीण महिला आणि मजुरांचे शोषण वाढले आहे. पूर्वी घरातील ज्येष्ठ गोष्टी सांगून पुढच्या पिढीला घडवत असत, मात्र आता गोष्टी तळहातावर आल्याने त्यांचे संदर्भ तुटले आहेत. जुन्या पिढीची शेती-मातीशी घट्ट नाळ होती, ती आजच्या पिढीत दिसत नाही. त्यामुळे युवा पिढी शहराकडे आकर्षित होत आहे. मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आले असले तरी आपापसातील नाती हरवत चालली आहेत, अशी खंत गाडेकर यांनी व्यक्त केली.
डॉ.कोठेकर यांनी कार्यकर्त्यांना संवेदनशील असण्याचा, पण भावनांच्या आहारी न जाण्याचा सल्ला दिला. यावेळी दिनेश शिंदे यांचा ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.अनंत मोगल यांनी, सूत्रसंचालन बालासाहेब पंडित यांनी, तर आभार प्रदर्शन सुनील कौसडीकर यांनी केले. कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रकाश धामणगावकर, रामराम बोबडे, दादासाहेब गाडेकर यांच्यासह रायपूर येथील श्रोते उपस्थित होते. विजय ढाकणे, माधव गव्हाणे, डॉ.सुरेश हिवाळे यांनी कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला.





