
कथाकथन, बालकवी संमेलन, बाल नाटिका आणि एकपात्री प्रयोग रंगले
परभणी : वाचनामुळे मानवी जीवनाला प्रगल्भता येते आणि नीतिमूल्यांचे संस्कार घडतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केले. आदर्श शिक्षक बजरंग गिल्डा बालवाचक साहित्य नगरी, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे आयोजित दुसऱ्या अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या संमेलनाला जिल्हाभरातील बालवाचकांनी उदंड प्रतिसाद दिला.
प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी सांगितले की, संस्कार हरवत चाललेल्या समाजात अशा बालवाचक साहित्य संमेलनातून संस्कार पेरण्याचे कार्य होत आहे. वाचनामुळेच आपण घडलो असल्याची प्रतिक्रिया बालवाचक कल्याणी आडे आणि भक्ती घांडगे यांनी दिली. यावेळी उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे देखील उपस्थित होते.
या साहित्य संमेलनात ‘चालता बोलता वाचनावर गप्पा’, ‘मी वाचनाने घडत आहे’, कथाकथन, बालकवी संमेलन, बाल नाटिका आणि एकपात्री प्रयोग यांसारखी विविध सत्रे झाली. संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तर मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव उपस्थित होते. भालेराव यांच्या कविता गायनाने बालवाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांनी कविता म्हणजे काय आणि कविता कशी करावी याबद्दल मुलांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
त्र्यंबक वडसकर दिग्दर्शित ‘हामुरा’ ही एकांकिका आणि चि. समर्थ गोपी मुंडे यांनी सादर केलेला ‘तुका म्हणे…’ हा एकपात्री प्रयोग विशेष लक्षवेधी ठरले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी केले, तर इंदूमती कदम यांनी सूत्रसंचालन केले. समारोप सत्राचे सूत्रसंचालन अनिल पत्की यांनी केले, प्रास्ताविक गोपी मुंडे यांनी, तर आभार राजेश चव्हाण यांनी मानले.
संमेलन यशस्वी करण्यासाठी बलभीम माथेले, पंडित दाभाडे, राजेंद्र शिंदे, दीपक हारकळ, अनंता कदम, युवराज माने, कैलास सुरवसे, रत्नमाला शेळके, दिपाली महिंद्रकर, नरहरी मुटकुळे, संतोष रत्नपारखे, विठ्ठल अनमुलवाड, गोपी मुंडे, महेश पुरी, विनायक पौळ, प्रकाश रापिल्लेवार, सुशीला नवले, दत्तात्रेय भोंबे, मधुकर काष्टे, मारुती डोईफोडे, नामदेव घुले, सुलक्षणा कचरे, प्रकाश डुबे यांच्यासह सहभागी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.





