सेलू तालुका दबाव गटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
परभणी : मराठवाड्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन फळबाग रोगप्रतिबंधक यंत्रणा अद्ययावत करावी, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोसंबी, संत्रा आणि लिंबू यांसारख्या फळबागांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बुरशीसदृश रोगांमुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. सरकारने या समस्येवर त्वरित लक्ष देऊन संशोधन विभाग अधिक सक्रिय करावा, तसेच यासाठी इतर कृषी विद्यापीठांची मदत घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ आदींसह सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




