परभणी : दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे रविवारी, १७ ऑगस्ट रोजी आयोजित आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान सोहळ्यात जिल्ह्यातील ६५ उपक्रमशील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर होत्या. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानचिन्ह प्रदान झाले. प्रमुख पाहुणे म्हणून वृत्तनिवेदक विलास बडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानदीप प्रज्वलित करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. समाजाला योग्य दिशा देण्याचे मोलाचे कार्य शिक्षक पार पाडतात. जसा शिक्षक, तसा समाज घडतो, असे मत पत्रकार आणि वृत्तनिवेदक विलास बडे यांनी मांडले. शिक्षकांनी केवळ ज्ञान देण्यापुरते न थांबता, विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलता, सर्जनशीलता, आणि जबाबदारीच्या भावनेलाही चालना द्यावी, असे ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी सांगितले की, दीपस्तंभ ही संस्था शिक्षकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे, तर जबाबदारीची जाणीव आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना आधुनिक प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपावी. प्रास्ताविक बाळू बुधवंत यांनी केले. डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन गिरीश बोरगावकर यांनी केले.या सोहळ्याला परभणी जिल्ह्यातील अनेक मान्यवर, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाने शिक्षकांमध्ये नवचैतन्य फुलले आहे.





