पावसाळ्यात जनतेचे हाल, गावाने ‘लालपरी’ पाहिलीच नाही!
परभणी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष उलटली, नुकताच स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा झाला. मात्र वाघाळा–फुलारवाडी हा अवघा साडेतीन किमीचा रस्ता आजही केवळ नेत्यांच्या आश्वासनापुरता राहिला आहे. अजूनपर्यंत या मार्गावरून राज्य परिवहन मंडळाची लालपरी धावलीच नाही. रस्ता अरुंद, खडबडीत व धोकादायक असल्याने प्रवास करणे धोकादायक ठरते.
१९९४ मध्ये माती व मजबुतीकरणाचे काम झाले; त्यानंतर डांबरीकरण मात्र झाले नाही. निवडणुकीत वारंवार आश्वासने देऊन नागरिकांची बोळवण करण्यात आली. या रस्त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी पारधी वस्तीतील नागरिक प्रचंड अडचणीत आहेत. पावसाळ्यात आजारी रुग्ण दवाखान्यात पोहोचण्याआधी मृत्यू पावल्याच्या, तर महिलांची प्रसूती रस्त्यात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गावकऱ्यांची मागणी आहे की, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून एकदाच पक्का करावा. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तातडीने लक्ष घालून फुलारवाडीकरांचे लालपरीचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





