सेलू : परभणी जिल्ह्यातील ब्रह्मवाकडी (ता.सेलू) येथे असलेला निम्न दुधना सिंचन प्रकल्प यंदा चांगलाच भरला असून गुरूवारी, २८ ऑगस्टरोजी सकाळी सहा वाजता प्रकल्पाचा जिवंत पाणीसाठा १८१.३२१ द.ल.घ.मी. म्हणजे ७४.८६ टक्के झाला आहे. मागील वर्षीच्या याच दिवशी धरणात केवळ ५७.३०२ द.ल.घ.मी. (२३.६६%) पाणीसाठा होता. या वर्षी त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे यंदा सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असणार आहे.
आज सकाळी ६ वाजेपर्यंत ५० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. या हंगामात एकूण ५८१ मिमी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत एकूण ६२० मिमी. पावसाची नोंद झाली होती. प्रकल्पातून कालव्याद्वारे कोणताही विसर्ग सुरू नाही. पिण्याच्या पाण्याकरिता ०.०३१० द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. १ जून २०२५ पासून आतापर्यंत सांडव्याद्वारे २४.४१० द.ल.घ.मी. पाणी बाहेर सोडण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे.
सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू
प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या २४ तासांत प्रकल्पात १३११ क्युसेक (Cusecs) वेगाने पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे ०.१ मीटरने उघडण्यात आले आहेत आणि सांडव्याद्वारे ६७२.५८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





