राजारामनगरवासिय आक्रमक; पालकमंत्री बोर्डीकर, मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
सेलू : सेलू येथील राजाराम नगरमध्ये एअरटेल कंपनीकडून उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या टॉवरला कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आणि ७० टक्के रहिवाशांची संमती नसतानाही याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.
या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी राजाराम नगरातील महिला, पुरुष आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपली निवेदने पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना दिली; तसेच सेलूच्या मुख्याधिकारी यांनाही निवेदन सादर केले. त्यावेळी या टॉवरसाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार रहिवासी भागात टॉवर उभारणीसाठी ७० टक्के रहिवाशांची संमती आवश्यक असते, मात्र, अशी संमती घेण्यात आलेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यावेळी सेलू येथील पोलीस उपनिरीक्षक आणि मुख्याधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदनावर ५० नागरिकांच्या सह्या आहेत.
आरोग्यसाठी हानीकारक
सर्व्हे क्रमांक ६ मधील भूखंड क्रमांक २ मध्ये हे टॉवर उभारले जात आहे. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतील, तसेच रेडिएशनमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. रहिवासी भागात टॉवर उभारणे धोकादायक असतानाही हे काम सुरू असल्याने सर्व स्थानिक रहिवासी एकत्र आले असून, हे टॉवर होऊ नये अशी त्यांची मागणी आहे.





