समृद्धी महामार्ग भूसंपादनाची प्रक्रिया थांबवण्याची बच्चू कडू यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
परभणी : नांदेड-जालना समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी, अमरावती येथे माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडत, प्रशासनाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.
परभणी जिल्ह्यातील सेलू आणि जिंतूर तालुक्यातील शेतकरी, जमिनीला मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्यामुळे नाराज आहेत. सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी, चिकलठाणा खुर्द, चिकलठाणा बुद्रुक, रायपूर, वालूर, हातनुर, गुळखंड, तांदुळवाडी, हट्टा आणि जिंतूर तालुक्यातील मारवाडी या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन योग्य दरात होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. या अन्यायाविरोधात शेतकरी सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असतानाही, प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे शिष्टमंडळाने बच्चू कडू यांना सांगितले
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी तत्काळ परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेचा निर्णय होईपर्यंत भूसंपादनाची पुढील कोणतीही प्रक्रिया न राबवण्याची स्पष्ट सूचना दिली.
या शिष्टमंडळात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तसेच प्रशांत नाईक, रमेश माने, निशांत मुंढे, विजय खरात आणि राजेश मोहिते आदींचा समावेश होता.





