भटके विमुक्त दिवसानिमित्त कार्यक्रम : जात प्रमाणपत्रांचे वाटप
परभणी : परभणी येथील जायकवाडी वसाहत सामाजिक न्याय भवन येथे जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या वतीने भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना व्हिजेएनटी जात प्रमाणपत्रे आणि विविध स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना फुले समग्र वाङ्मय खंड देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार विष्णू पकवाने होते, तर प्रमुख वक्ते म्हणून सुरेश देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजू एडके, ऋषिकेश सुकुमार, इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी शेख अजमेर, सहाय्यक लेखाधिकारी वामन काकडे, मंडळाधिकारी विजय राठोड, निरीक्षक तुकाराम भराड आणि निरीक्षक दत्ताहरी कदम हे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून केली.
यावेळी मान्यवरांचा ‘क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले’ आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या वाङ्मयाचे खंड देऊन सत्कार करण्यात आला.तहसील कार्यालय, परभणी येथे व्हिजेएनटी विशेष जात प्रमाणपत्र शिबिरात सहभागी झालेल्या १९ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि फुले समग्र वाङ्मय खंड देऊन सन्मानित करण्यात आले.त्यानंतर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित निबंध, चित्रकला, रांगोळी, पोवाडा आणि माहितीपट/वक्तृत्व स्पर्धांमधील ३७ विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धा ४० आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांमध्ये घेण्यात आल्या होत्या. याशिवाय, १०वी आणि १२वीच्या कला व विज्ञान शाखेत गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.१५० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार उत्तम काम करणाऱ्या आश्रमशाळांपैकी प्राथमिक आश्रमशाळा मालेवाडी, माध्यमिक आश्रमशाळा राणीसावरगाव आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा वालूर येथील मुख्याध्यापकांना प्रशस्तीपत्र आणि समग्र खंड देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आश्रमशाळा वालूर येथील भक्ती रोकडे हिने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अशोक पिसाळ यांनी भक्ती रोकडे हिचा सन्मान केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. साळेगावकर यांनी केले, तर गणेश जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शासकीय वसतिगृहांतील कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.भटके विमुक्त समाजाचा सन्मान दिवस : रामेश्वर मुंडेप्रास्ताविक भाषणात इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे म्हणाले की, ब्रिटिश सरकारच्या विरोधात भटके विमुक्त समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे ब्रिटिशांनी १८७१ साली ‘भटक्या जमाती गुन्हेगार कायदा’ लागू केला. या कायद्यामुळे या समाजाला दोन ते तीन पिढ्या अमानुष अत्याचार सहन करावे लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने हा क्रूर कायदा रद्द करून या समाजाला मुक्त केले. म्हणूनच, शासनाने हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे, जो या समाजाच्या सन्मानाचे प्रतीक आहे. यावेळी सुरेश देशमुख यांनी भटक्या जमातीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.





