भारतीय जनता पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
परभणी : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीच्या परभणी ग्रामीण शाखेने शुक्रवारी (दि. १९) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ८५० गावे असून, पर्जन्यमापक यंत्र फक्त ५२ मंडळ ठिकाणीच कार्यरत आहेत. त्यामुळे इतर अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही त्याची नोंद झाली नाही. अतिवृष्टीमुळे नदी-नाले आणि ओढ्याकाठची शेती पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे, तसेच इंद्रायणी आणि गोदावरी नद्यांच्या काठी पाणी साचलेले आहे.
यामुळे, केवळ अतिवृष्टीचा निकष न लावता, प्रशासनाने सर्व मंडळांतील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास बाबर, रामराव कोळेकर यांच्यासह चंदन पवार, विकास सादगे, नर्सिंग धुमाळ, गणेश कोंडगीर, भीमराव धुमाळ, शेख लतिफ, विशाल पवार आणि सुरेश कच्छवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





