स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी
परभणी : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने अद्याप पंचनामे केले नाहीत. त्यातच, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली केवळ १२८ कोटी रुपयांची आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या शासन निर्णयाची शुक्रवारी (दि. १९) होळी करून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनादरम्यान, संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांनी पंचनाम्याचे आदेश देऊनही कोणत्याच तालुक्यात अद्याप पंचनामे पूर्ण झाले नाहीत. गेल्या वर्षी ५४८ कोटी रुपयांची मदत मिळाली होती, त्या तुलनेत यंदा केवळ १२८ कोटींची मदत अन्यायकारक आहे. सरकारने पीकविमा निकषांमध्ये बदल करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
या पार्श्वभूमीवर, संघटनेने शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. यामध्ये पीकविमा नियमांमध्ये तातडीने दुरुस्ती करणे, एनडीआरएफच्या निकषांनुसार तात्काळ नुकसान भरपाई देणे, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये मदत देणे आणि रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींचे व गोयगोठाचे कुशल बिल तात्काळ देण्यासारख्या मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह रामप्रसाद गमे, गजानन कुऱ्हे, मुंजा लोढे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





