ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी देण्याची प्रहारची मागणी
परभणी : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत झालेल्या ७०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ‘आता तरी देवा आम्हाला पावशील का, शेतकरी कर्जमाफी करशील का?’ अशा आशयाचे भजन-कीर्तन करत हे अनोखे आंदोलन शुक्रवारी (दि. १९) पार पडले.
प्रहारने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले, ज्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून दिली. तसेच, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. बच्चू कडू यांच्या उपोषणवेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.





