आमदार डॉ.पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
परभणी : सरसकट सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर होणे गरजेचे असताना परभणी तालुक्यातील झरी, टाकळी कुंभकर्ण या मंडळांना वगळण्यात आले आहे. या मंडळात देखील खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे या दोन्ही मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समावेश करावा , अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी तालुक्यातील झरी, टाकळी कुंभकर्ण या मंडळांना वगळण्यात आले आहे. वास्तविक याच मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. झरी मंडळातील झरीसह मांडवा, जलालपूर, मिर्झापूर, नांदापूर आदी भागात सोयाबीन,कापूस, तुर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके संपूर्णतः वाया गेली आहेत. टाकळी कुंभकर्ण या मंडळातदेखील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे, असे आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे. यावेळी सदाशिव देशमुख, संदीप झाडे, बंडुनाना बिडकर, उत्तम मुळे, उमेश देशमुख, मोईन पटेल, रामा कदम, शिवाजीराव चोपडे, गंगाधर गाडगे शेख खाजा, कृष्णा गलांडे, ज्ञानेश्वर खनपटे आदी उपस्थित होते.





