मानवत तालुक्यातील पिक नुकसानीची पाहणी
परभणी : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी मानवत तालुक्यातील पूरबाधित गावे थार, वांगी, वझुर या ठिकाणी भेट देऊन संपर्क तुटलेल्या गावांची तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित व स्थलांतरित नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला. त्यांच्या हस्ते बांधितांना धान्याचे वाटपही करण्यात आले.अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक नागरिकांचे संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले आहे. प्रशासनाने पूर परिस्थितीत दाखवलेल्या तत्परतेबद्दल बाधित व इतर नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी भारतीय सेनादलाचे लेफ्टनंट कर्नल अभिषेक, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.





