जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे प्रतिपादन
परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. माहिती अधिकार अधिनियम-२००५ हा कायदा नागरिकांच्या हितासाठी करण्यात आला आहे. या कायद्याची प्रत्येक कार्यालयाने जबाबदारीने अंमलबजावणी करावी. या कायद्यातील तरतूदी समजून घेऊन नागरिकांना वेळेत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, अरुणा संगेवार आणि यशदाचे माहिती अधिकार कायद्याचे तज्ञ गणेश तायडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण पुढे म्हणाले की, शासन हे नागरिकांसाठी काम करते. त्यामुळे शासकीय कार्यालयात करण्यात येणारे काम जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम-२००५ कायद्यान्वये देण्यात आला आहे. या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे हे प्रत्येक कार्यालयाचे कर्तव्य आहे. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा. आपल्या कार्यालयातील अभिलेखे, दैनंदिन कामकाजासंबंधीची कागदपत्रे काळजीपूर्वक जतन करावीत. अद्यावत ग्रंथालयाप्रमाणे अभिलेखे व्यवस्थित ठेवावेत. संगणक व एआय तंत्राची यासाठी मदत घ्यावी, जेणेकरून नागरिकांना माहिती देणे सुलभ होईल. मात्र या कायद्याचा कुणीही दुरुपयोग करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.माहिती अधिकार तज्ञ श्री. तायडे यांनी माहिती अधिकार अधिनियम-२००५ कायद्याची पार्श्वभूमी, उद्देश व महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन श्रीमती भालेराव यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





