परभणी : नवरात्रोत्सवातील नववी माळ पूर्ण झाली असून, आज विजयादशमी अर्थात दसरा साजरा होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या दिवशी ग्राहक नवनवीन वस्तुंची खरेदी करतात. त्यासाठी सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांची दुकाने सजली आहेत. विजयादशमीला गुंजभर तरी सोने खरेदी करावे, अशी परंपरा आहे. मात्र, यंदा परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतपिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे या वर्षीच्या दसऱ्यावर ओल्या दुष्काळाचे गडद सावट आहे. असे असुनसुद्धा ऋण काढून सण साजरा करण्याची हिमंत सर्वसामान्य माणूस ठेवून आहे. हीच भारतीय संस्कृतीची खासीयत आहे.
देवींच्या मंदिरांत भरगच्च कार्यक्रम
नवरात्री महोत्सवानिमित्ताने शहरासह जिल्ह्यातील देवींच्या मंदिरांमधून यावर्षी भाविकांची दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.यावर्षीच्या नवरात्र महोत्सवावर पावसाचे व ओल्या दुष्काळाचे सावट असले तरी, भाविकांचा उदंड उत्साह जाणवला. शहरी व ग्रामीण भागातील देवीच्या मंदिरांमधून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची प्रचंड वर्दळ राहिली. नवमीच्या निमित्तानेही आजही गर्दी कायम होती. परभणी शहरातील श्री अष्टभूजा मंदिर, आशीर्वाद नगरातील श्री देवीचे मंदिर, शनिवार बाजारातील श्री रेणुका मातेचे मंदिर, गवळी गल्लीतील श्री तुळजाभवानी मंदिर, बारबिंड गल्लीतील रेणुकामाता मंदिर, दत्तधाम जवळील श्री हिंगलाज माता मंदिरांसह अन्य मंदिरांमधून गेल्या दहा दिवसांत लाखो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पहाटेपासून सुरू असलेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती.
जिल्ह्यातील श्रीक्षेत्र राणीसावरगाव येथील श्री रेणुका माता, गौंडगाव येथील श्री रेणुका माता, भोसा येथील इंद्रायणी देवी मंदिर, पेडगाव येथील रेणुका माता मंदिर, धर्मापुरी येथील देवी मंदिर, डिघोळ येथील जगदंबा रेणुका माता मंदिर, बोरी जवळील श्री रिडज येथील देवीचे मंदिर, आरळची अन्नपूर्णा माता मंदिर, सेलू, जिंतूर आणि भोगाव येथील जगदंबा माता मंदिरात यावर्षी भाविकांची लक्षणीय गर्दी उसळली होती. विशेषतः राणीसावरगाव, श्रीक्षेत्र भोगाव व इंद्रायणीच्या माळावरील वाहतूक भाविकांच्या गर्दीने वारंवार ठप्प होत होती.





