मुख्याधिकार्यांना निवेदन; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
सेलू : सेलू शहरातील काही भागात जलवाहिनी गळतीमुळे अस्वच्छ व गाळयुक्त पाणी पुरवठा होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्याकडे शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरवासीयांनी यापूर्वी तोंडी तक्रार केली होती आणि त्याची दखल घेऊन नगर परिषदेने जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम प्रगतीपथावर असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मात्र, शहरातील काही भागांमध्ये अजूनही पाईपलाईन लिकेज असल्यामुळे गाळमिश्रित व दूषित पाणी येत आहे.याबाबत पाणी पुरवठा विभागाकडे चौकशी केली असता, कर्मचारी कमी असल्यामुळे लिकेज काढण्याच्या कामाला उशीर होत असल्याचे कारण देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर रमेश दौड, सतीश जाधव आणि सचिन कोरडे यांच्यासह अन्य नागरिकांनी स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी व पाणी योजनांच्या सुधारणेसाठी नगर परिषदेकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या : १. पाणी पुरवठा विभागास जास्तीचे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून लिकेजचे काम त्वरित पूर्ण होऊन स्वच्छ पाणी मिळेल.
२. जलशुद्धीकरण केंद्राच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात आला आहे. यात जलशुद्धीकरण प्रक्रिया पूर्णत: संगणकीकृत करावी, केंद्रावर प्रशिक्षित पंप ऑपरेटरची नियुक्ती करावी.
३.पाण्याची तपासणी व निर्जंतुकीकरण केल्याशिवाय पाणी शहरात न सोडण्याची मागणी केली आहे. निर्जंतुकीकरणासाठी लिक्विड क्लोरीन गॅसचा वापर करण्याची सूचनाही नागरिकांनी केली आहे.
४.शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे आणि कमी-अधिक दाबाचा पुरवठा होत असल्यामुळे नवीन टाक्यांची उभारणी करण्याची तसेच वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्याची मागणीही यात करण्यात आली आहे.
५. याव्यतिरिक्त, पाण्याच्या टाक्यांची व जलशुद्धीकरण केंद्राची वर्षातून दोन वेळा धुऊन साफसफाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे आणि शहरवासीयांना स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.





