शासकीय सेवेत कर्तव्यनिष्ठेने जनतेची सेवा करावी : पालकमंत्री मेघना बोर्डीकर
परभणी : अुनकंपा तत्वावर आणि एमपीएससी मार्फत शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांनी नोकरीच्या माध्यमातून कर्तव्यनिष्ठा व प्रामाणिकपणे जनतेची सेवा करुन आपले राज्य व देशाचे भविष्य उज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी, ४ऑक्टोबररोजी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी दूरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री बोलत होत्या.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे आदींसह नोकरीसाठी निवड झालेले उमेदवार व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीव्दारे निवड झालेल्या १३७ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये अनुकंपाचे ९७ आणि एमपीएससी मार्फत नियुक्त ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, या भरतीमुळे राज्यशासन अधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात विकसित भारत-२०४७ ही देशाची नवीन ओळख निर्माण होणार आहे. जिल्हाधिकारी श्री.चव्हाण म्हणाले की, नोकरीवर असताना घरातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्यामुळे अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकरीचे महत्व जाणून घेत उमेदवाराने नियुक्तीच्या ठिकाणी मन लावून सकारात्मक पध्दतीने काम करावे. आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घ्यावी. प्रास्ताविक श्रीमती ढालकरी यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण वायकोस यांनी केले.





