डॉ.अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन, सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूल परिसरात विज्ञान केंद्राचे भूमिपूजन
सेलू (जि.परभणी) : भारत जगातील अग्रगण्य देश व्हावा यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि तरूणाईमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टी व संशोधकवृत्ती विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांनी शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी सेलू येथे केले.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र राज्य आणि श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने “क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर” या महत्त्वाकांक्षी विज्ञान केंद्राचा भूमिपूजन सोहळा शनिवारी प्रिन्स इंग्लिश शाळेच्या परिसरात उत्साहात पार पडला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ.काकोडकर बोलत होते.
यावेळी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, वैज्ञानिक दिनेश जगताप, रामेश्वर मुंढे, श्रीनिवास औंधकर, आयोजक श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, डॉ.सुनील मोडक, प्रा.महेश पाटील, डॉ.रामराव रोडगे, शालिनी काटकर, डॉ.सविता रोडगे, डॉ.गणेश पारवे, डॉ.अपूर्वा रोडगे, सुजित काटकर, सुजाता काटकर, महंमद इलियास आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी “जे माहिती नाही ते जाणून घेण्याची जिद्द” बाळगावी, असे आवाहन करताना डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, की जशी संसाधने मिळतील तशी विज्ञान केंद्रे देशभर उभे राहावेत. सामूहिक प्रयत्नांतून आणि उद्दिष्टपूर्तीसाठी सातत्य ठेवल्यास भारत निश्चितच संशोधन आणि नवकल्पनांमध्ये अग्रणी ठरेल. तरुणाई ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. कामात सातत्य आणि उद्दिष्ट ठेवल्यास विज्ञान केंद्रांद्वारे नवकल्पना साकारणारी वैज्ञानिकांची पिढी तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमापूजन व द्वीपप्रज्वलनाने झाली. या विज्ञान केंद्रामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यास मदत होईल. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि नवकल्पनांचा विकास करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भविष्यात संशोधन आणि उद्योगक्षेत्राकडे वाटचाल करण्यासाठी हे केंद्र प्रेरणादायी ठरेल, असे डॉ.संजय रोडगे यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व प्रा. महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.सुनील मोडक यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले.





