पांगरी येथे दिवाळीनिमित्त काव्यगायन व डॉ. रामेश्वर नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव
जिंतूर : मौजे पांगरी (ता. जिंतूर) येथे दिवाळी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही “गुणगौरव सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पंढरीनाथ देवस्थान संस्थेच्या मंगल कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री कांताबाई शिंदे यांच्या काव्यगायनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. त्यांना शाहीर लक्ष्मण हिरे यांनी साथ संगत दिली, तर निवेदक दीपक शिंदे होते आणि इंद्रजित पिवळ यांनी सहाय्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय देवकते हे होते. परभणी येथील सुप्रसिद्ध डॉ. रामेश्वरजी नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक सुभाष सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. पांगरी येथील हा उपक्रम मागील ३० वर्षांपासून, म्हणजे १९९५ सालापासून, अविरतपणे सुरू असून गावातील नव तरुण मंडळी लोकसहभागातून याचे आयोजन करतात.
कवयित्री कांताबाई शिंदे यांनी आपल्या बहारदार आवाजात अनेक हृदयस्पर्शी कविता सादर केल्या. त्यांनी शिक्षणावर आधारित आपली प्रसिद्ध कविता, ‘ज्योतिबाची पुण्याई, शिक्षण आणिले बाई। शाळेत जाय रे बाळा, अडाण्याला किंमत नाही II’ या ओळींतून शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. त्यानंतर ‘याला जेवण वेळेवर नायना, शेतकऱ्याची पाहा बाई दयीना, खत-बियाचा खर्च बाई जाईना…’ या गीतामधून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वास्तव परिस्थितीचे जिवंत चित्रण घडवत समाजमन हेलावून सोडले. यासोबतच ‘पंढरीचा राजा, पांडुरंग माझा l हाऊस मला, दिंडीत जायाची, वारी आली पंढरीरायाची ll’ अशा भक्तिपूर्ण ओळींतून त्यांनी संतपरंपरेवरील भक्तीभाव व्यक्त केला. तसेच मराठी अस्मितेचा जयघोष करणाऱ्या ओळी सादर करत प्रेक्षकांना उर्जित केले. कुटुंबातील नातेसंबंध, भाऊ-बहीण, सासू–सून, गावाचा एकोपा आणि व्यसनमुक्ती यांसारख्या सामाजिक विषयांवरही त्यांच्या कवितांनी विचारांची दिशा दिली.
डॉ. रामेश्वरजी नाईक यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, पांगरी गावाची सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय आहे. केवळ कार्यक्रम न घेता उपक्रम राबवले पाहिजेत आणि दिवाळीनिमित्त आयोजित केलेला हा गुणगौरव सोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. असे उपक्रम गावोगावी झाले, तर विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि युवकांना प्रोत्साहन मिळेल. काव्य गायन ऐकण्यासाठी जिंतूर तालुक्यातून विविध गावचे शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंढरीनाथ देवस्थान संस्थान आणि संपूर्ण गावकरी मंडळींनी एकदिलाने सहकार्य केले. या सोहळ्याने पांगरी ग्रामस्थांच्या अंतःकरणात साहित्य, संस्कृती आणि समाजप्रबोधनाची नवचेतना जागवली.





