‘सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, पुणे’ संबंधित निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयात सादर
सेलू : “सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, पुणे” या धार्मिक आणि सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयात पारदर्शकता, ट्रस्ट डीडमधील तरतुदींचे पालन आणि प्रशासकीय कार्यवाहीत निष्पक्षता राखावी, या प्रमुख मागणीसाठी सेलू येथील संपूर्ण जैन समाजाने आज सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी शांततेत मोर्चा काढला.
सकाळी १०.३० वाजता श्री जैन मंदिरात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आले. समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडवत सर्वजण अत्यंत शांततेच्या मार्गाने एकत्रितपणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. सकाळी ११.०० वाजता कार्यालयात पोहोचल्यावर नायब तहसीलदार श्रीकृष्णा देशमुख यांनी समाजाचे निवेदन स्वीकारले. समाजाचा हा मोर्चा पूर्णतः अनुशासित, मौन आणि शांततेच्या वातावरणात पार पडला, हे विशेष. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये जैन समाजाचे अध्यक्ष निलेश बिनायके यांच्यासह अशोक काला, रमेश काला, सतीश गंगवाल, जीतेन्द्र गंगवाल, अशोक वानरे, ऋषभ काला, ईश्वर जैन, रोहित काला, पुनमचंद खोना आणि समस्त समाज बांधव उपस्थित होते.
या मोर्चात आणि आंदोलनात अशोक भंडारी, महावीर आँचलिया, महावीर गंगवाल, नेमिनाथ दुत्ते, सुमीत काला, परेश संगई, रुपाली गंगवाल, भारती काला, रूपा काला, सुनीता काला, गादिया, चिराग रूपडा तसेच इतर अनेक जैन बांधव आणि भगिनीवर्गाने अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. मोर्चाचे आयोजन आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी निलेश बिनायके, ऋषभ काला, आशिष बिनायके, दीपक बिनायके, जितेंद्र गंगवाल, देवेंद्र काला, गीताराम कोकणे आणि विश्वंबर सर यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी समाजाच्या वतीने अध्यक्ष निलेश बिनायके यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या पुणे येथील मालमत्तेच्या विक्री संदर्भात झालेली अपारदर्शकता आणि समाजातील भावना दुर्लक्षित करणे हे अत्यंत निंदनीय आहे. ट्रस्टच्या डीडमध्ये स्पष्ट तरतुदी असताना जर समाजाच्या हिताला बाधा पोहोचवणारे निर्णय होत असतील, तर हा गंभीर विषय आहे. समाजाने दाखवलेली एकजूट, अनुशासन आणि शांततेचे पालन हे संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरले आहे. समाजाच्या मागण्या प्रशासनापर्यंत योग्यरीत्या पोहोचवून, ट्रस्टच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी हा मोर्चा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, पारदर्शक समिती नेमावी आणि समाजाशी समन्वय साधून पुढील निर्णय घ्यावेत, अशी आग्रही मागणी जैन समाजाने केली आहे.






