उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन, ताडबोरगांव, ढेंगळी पिंपळगाव येथे शेतकरी संवाद
परभणी : मराठवाड्यात यंदा मागील १०० वर्षातील अभूतपूर्व अशी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे पिके, जनावरे, शेत आखाडे, घरातील भांडी – कुंडी आणि संसार वाहून गेला. मी पुढच्या महिन्यात पुन्हा येईन तोपर्यंत या दगाबाज सरकारचा पंचनामा करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा )पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. ते शिवसेनेच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद दौऱ्यात मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे शनिवारी, ८ नोव्हेंबर रोजी बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्म, महानगराध्यक्ष डॉ. विवेक नावंदर आदींसहित पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आत्महत्येने घरदार उघडी पडतात, आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. दरम्यान ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका करत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये जाऊन लोकांना “अंदर की बात” सांगत सुटले आहेत. मात्र मी तुम्हाला अंदर की बात सांगतो,फडणविसांनी या जवळच्या मुख्यरस्त्यावरून या गावापर्यंत बैलगाडीने यावं, मग अंदर काय राहतं? ते सांगावं. कुणाचीही मागणी नसताना या परिसरातून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. त्यासाठी ८६ हजार कोटींचे बजेट आणि सिमेंट कंपनीसाठी अदानीला जागा दिली आहे.
यावेळी ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जोपर्यंत तुमची कर्जमाफी होत नाही, हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळत नाही तोपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात ठाण मांडून बसा, जोपर्यंत तुम्ही सरकारचा श्वास कोंडत नाही, एकवटून सरकारचा गळा दाबत नाही तोपर्यंत हे सरकार तुमच्याकडे लक्ष देणार नाही, असे दोन कार्यक्रम शेतकऱ्यांना देऊन सरकारने शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती करावी, हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशा प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या. श्री.ठाकरे यांनी सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव तसेच शुक्रवारी पिंगळी येथील शेतकऱ्यांशीही संवाद साधला.
फोटो : शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आपल्या परभणी जिल्हा दौऱ्यादरम्यान ताडबोरगाव व ढेंगळी पिंपळगाव शिवारातील आपदग्रस्त शेतकऱ्यांबरोबर सुसंवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार संजय जाधव,आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (छायाचित्र : शैलैश डहाळे)





