सेलूच्या नूतन विद्यालयाची उत्तर भारत सहल उत्साहात : शिस्त, स्वावलंबनाचे गिरवले धडे
सेलू् : येथील नूतन विद्यालयाच्या ‘उत्तर भारत दर्शन’ शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच परतीच्या प्रवासात ‘दिल्ली ते हैदराबाद’ असा विमान सफरीचा अनुभवानंद देण्यात आला. दहा दिवसीय सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वावलंबन, शिस्त पाळृत, विविध ऐतिहासिक, शैक्षणिक स्थळांना भेट देऊन तसेच उच्चपदस्थ व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आचारविचाराचे धडे गिरवले. या सहलीमध्ये ७० विद्यार्थी आणि ९ शिक्षक सहभागी झाले होते.
सुवर्ण मंदिर अमृतसर, आटारी वाघा बॉर्डर, जयपूर, आग्रा, फतेहपूर शिक्री, मथुरा, वृंदावन, दिल्ली येथे राष्ट्रपती भवन, अक्षरधाम आदी स्थळांना भेटी दिल्या. संस्थाध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली १२ ते २२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही सहल पार पडली. यशस्वीतेसाठी प्रमुख अनंतकुमार विश्वांभर, सहप्रमुख सुशील कुलकर्णी तसेच शिक्षक गणेश माळवे, बाबासाहेब हेलसकर, भगवान देवकते, शुभांगी आष्टीकर, सुनिता सांगुळे, प्रसाद कायंदे यांनी परिश्रम घेतले. सहलीसाठी उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, शिक्षक अशोक लिंबेकर, किशोर कटारे तसेच राज्यपालांचे ओएसडी राजकुमार सागर, श्रीमंत जैन, दिनेश जैन (जयपूर), सनी जैन, निलय जैन, गणतंत्र जैन (आग्रा) डॉ.उपेंद्र कोठेकर (नागपूर), राजू महाराज, दत्ता कुलकर्णी (नांदेड), सज्जन जैस्वाल, रघुवीर सिंग (अमृतसर), श्री मंदार (छत्रपती संभाजीनगर), संतोष पळसकर, लक्ष्मीकांत कदम, लक्ष्मण वांगे, श्री.भाले (पूर्णा) माजी विद्यार्थी किरण जामकर, अभिषेक सोळंके (दुबई), नायब सुभेदार वसंत पावडे, डॉ.अभिजीत सरकटे, ऋषिकेश बोराडे, डॉ.केतन देशमुख, संदेश संकपाळ, अजित सिंग (दिल्ली) माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मिलिंद सावंत, संत निरंकारी मंडळाच्या लक्ष्मी मेहता, रवि लांडगे,(सेलू) यांसह अनेकांचे बहुमोल सहकार्य लाभले.

चांगली कामे करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
विद्यार्थ्यांनी जयपूर येथील राजभवनात १६ नोव्हेंबर रोजी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि दिल्ली येथे १९ नोव्हेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सरकारी निवासस्थानी मनमोकळा संवाद साधला. राज्यपाल बागडे यांनी चांगले, दर्जेदार शिक्षण घेण्यावर भर द्या, असा मौलिक सल्ला दिला. तर मंत्री गडकरी म्हणाले, की मोठे व्हायचे स्वप्न बाळगा. त्यासाठी जात-पात, धर्म विरहित एक माणूस म्हणून चांगली कामे करा. गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्या. स्वकर्तृत्वानेच व्यक्तिमत्त्व घडवा. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घ्या. खेळ, कलागुणांना आविष्कृत करा. दिखाऊपणा टाळा. सकारात्मक राहा. मोबाईल म्हणजे एक प्रकारचे विष आहे. त्याचा सिमीत उपयुक्त वापर करावा आणि उज्ज्वल भविष्यासाठी मोबाईलच्या आहारी जाणे गंभीरतेने टाळले पाहिजे.





