सर्व केंद्रावर परीक्षा शांततेत व सुरळीत, ६४९ जणांची दांडी
परभणी : शिक्षक पदासाठी अनिवार्य केलेली शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) चे दोन पेपर रविवारी (दि.२३) ३६ केंद्रावर घेण्यात आले. यात सकाळच्या सत्रातील पहिल्या पेपरसाठी १६ केंद्रावर प्रविष्ठ असलेल्या ४ हजार ९४८ पैकी ४ हजार ६४१ तर दुपारच्या सत्रातील दुसऱ्या पेपरसाठी २० केंद्रांवर प्रविष्ठ असलेल्या ६ हजार १०९ पैकी ५ हजार ७६७परीक्षार्थी हजर राहिले होते. या दोन्ही पेपरला एकुण ६४९ परीक्षार्थी गैरहजर असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात रविवारी, २३ नोव्हेंबररोजी सुरळीत, शांततेत व शिस्तबध्द वातावरणात ही परीक्षा पार पडली. परीक्षे दरम्यान कोणताही अनवधानाने किंवा अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, पोलीस व महसूल यंत्रणेच्या प्रभावी समन्वयामुळे परीक्षा वेळेत व विना अडथळा पार पडल्याचे जिल्हा परीक्षा सनियंत्रण समितीने जाहीर केले. अधिकाऱ्यांनी विविध केंद्रावर जात सीसीटीव्ही नियंत्रण, प्रश्नपत्रिका वितरण, सुरक्षा व्यवस्था, परीरक्षकांची उपस्थिर्तीची पाहणी केली. सर्वत्र व्यवस्था समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर अनेक अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल पोलास यांनी जिल्हा परीक्षा सनियंत्रण समिती सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम केले. विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी सहाय्यक परीरक्षक म्हणून तर जिल्हा परीरक्षक मंगेश नरवाडे यांनी विविध केंद्रांतील पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडली. तसेच पोलीस व महसूल विभागाचेही योगदान महत्वाचे ठरले असून पोलीसांकडून सर्व केंद्रांवर योग्य सुरक्षा बंदोबस्त होता.
महसूल विभाग, जिल्हा परिषद, तसेच संबंधित संस्थांचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनांनीही आपापली जबाबदारी काटेकोर पार पाडल्याने संपूर्ण परीक्षा कोणत्याही गोंधळाविना यशस्वी,झाली. परीक्षेच्या सर्व टप्प्यांत पारदर्शकता राखत ती शांततेत व व्यवस्थित पूर्ण झाली. सर्व विभागांचा समन्वय उत्कृष्ट होता, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल पोलास यांनी सांगितले.





