श्री स्वामी समर्थ गुरूपीठ : नितीनभाऊ मोरे यांचे प्रतिपादन, सेलूत ‘भस्मालिंगार्चन सेवा’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात

सेलू : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने आयोजित ‘ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियान’ (मराठवाडा दौरा) अंतर्गत शनिवारी, १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात परमपूज्य गुरुमाऊलींच्या वतीने नितीनभाऊ मोरे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. येणारा काळ आव्हानात्मक असून, पुढील काही वर्षांत उद्भवू शकणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी विविध सेवांसह५ जानेवारी २०२६ रोजी उज्जैन येथील ‘भस्मालिंगार्चन सेवा’ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च अध्यात्मिक अनुभूतीसाठी केवळ ईश्वर उपासना करून भागणार नाही, त्याला समाजकार्याची जोड देणे आवश्यक असल्याचेही मत श्री नितीन भाऊ यांनी यावेळी व्यक्त केले.

श्री.नितीनभाऊ यांनी सांगितले की, सध्या जागतिक पातळीवर तिसरे महायुद्ध अटळ असल्याची परिस्थिती आहे. शस्त्रास्त्रे संपल्यामुळे युद्धाला तात्पुरता ‘ब्रेक’ मिळाला असला तरी, आगामी चार वर्षांत अनेक राष्ट्र या युद्धात सामील होतील आणि संहारक शस्त्रे वापरली जाऊन जगातील ३०-४० टक्के लोकसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, २०२५ मध्ये ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार निसर्गाचा असमतोल, युद्धजन्य परिस्थिती यांचा धोका असल्याने यापूर्वी गुरूमाऊलींच्या मार्गदर्शनात ‘वज्रचंडी याग’ संपन्न करण्यात आला होता.
सेवा कार्याचा उद्देश : संकटांवर मात करण्यासाठी आणि राष्ट्र व मानव कल्याणासाठी ‘घोरकष्ट उद्धारक सेवा’ तसेच गुरुमाऊलींच्या प्रेरणेने विविध तीर्थक्षेत्रांवर चक्रराज श्रीयंत्र सेवा (वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर), वज्रेश्वरी सेवा अशा विविध सेवा रूजू करण्यात आल्या आहेत.
अतिरेकी कारवायांचे संकट : २६ या तारखेला भारतात झालेल्या अतिरेकी कारवायांचे संदर्भ देत, येणारे २०२६ हे वर्ष अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असू शकते. अशा परिस्थितीत देशाचे आणि नागरिकांचे रक्षण व्हावे, कुठलाही त्रास व विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सेवेचा भावार्थ लक्षात घेऊन ही सेवा आवश्यक आहे, श्री नितीन भाऊ यांनी सांगितले.
भस्मालिंगार्चन विशेष सोहळा : येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, इतिहासात प्रथमच, ५ जानेवारी २०२६ रोजी ‘भस्मालिंगार्चन सेवा सोहळा’ पार पडणार आहे. या सेवेमुळे २०२६ मध्ये येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक आध्यात्मिक आधार मिळेल, असे श्री नितीन भाऊ म्हणाले.
समाजकार्य आणि अध्यात्म : स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजकार्य केले जाते. ग्राम आणि नागरी विकास सक्षमीकरण, सुसंस्कारित पिढी निर्माण करणे हे १८ विभागामार्फत राबवण्यात येणारे कर्मयोग आहे. केवळ ईश्वर उपासना करून भागणार नाही, त्याला समाजकार्याची जोड देणे आवश्यक असल्याचेही श्री नितीन भाऊ यांनी नमूद केले.
चित्त एकाग्रतेचा उपाय : श्री. नितीन भाऊ यांनी सध्याच्या विचलित मनःस्थितीवरही भाष्य केले. मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मन विचलित होत आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी बारा लक्ष “श्री स्वामी समर्थ जप” वहीत लिहिण्याचा सोपा उपाय सांगितला. जप लिहिल्याने चित्त एकाग्र होते, व्यसनमुक्तीसाठी मदत होते, आणि हठयोग करण्याची गरज न पडता उच्चतम आध्यात्मिक अनुभूती मिळू शकते.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत : यापूर्वी नितीन भाऊ यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच त्यांना मदत पुरविण्यासाठी केलेल्या कार्याचाही उल्लेख केला. गुरूपीठाचे कार्य विविध २० देशात सुरू असून, त्यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना आणि भाविकांना या सेवेशी जोडून घेण्याचे आवाहन केले. या वेळी बालकलाकारांनी सादर केलेल्या ‘वृद्धाश्रम मुक्त भारत’ नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विविध स्टॉलवर भेटी देऊन श्री.नितीनभाऊ यांनी सेवेकर्यांचा उत्साह वाढविला. मेळाव्याला सेवेकरी बंधू भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यासाठी सेलू् आणि परभणी जिल्ह्यातील सेवेकर्यांनी पुढाकार घेतला.




