सेलू नगरपालिका : प्रभाग दोन मधून दणदणीत विजय, शिक्षित नेतृत्व आणि सेवाभावी कार्याला सेलूच्या जनतेची पसंती
सेलू : सेलू नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०२ मधून डॉ. अनिकेत अशोकराव जोगदंड यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड ही केवळ निवडणूक यश नसून, लोकसेवेला आणि सातत्यपूर्ण कार्याला मिळालेली स्पष्ट जनमान्यता मानली जात आहे.या निवडणुकीत डॉ. जोगदंड यांनी अत्यंत प्रभावी आणि लोकाभिमुख प्रचार यंत्रणा राबवली. त्यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत, घराघरांत जाऊन समस्या जाणून घेतल्या. याच विश्वासाच्या बळावर त्यांनी माजी नगराध्यक्ष तसेच मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व असलेल्या उमेदवाराचा पराभव करून विजयश्री खेचून आणली.
वडीलांचा वारसा जपणारा लोकसेवक
डॉ.अनिकेत जोगदंड हे स्वतः उच्चशिक्षित असून शिक्षण, आरोग्य आणि प्रशासन यांचा समन्वय साधणारे आधुनिक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे वडील, दिवंगत डॉ.अशोकराव जोगदंड, हे देखील सेलू नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. हा वारसा डॉ.अनिकेत नव्या विचारसरणीसह पुढे नेत आहेत. ते शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असून राजर्षी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. दिग्गज व अनुभवी नगरसेवकाचा पराभव करून मिळवलेला हा विजय शहरातील बदलत्या राजकीय मानसिकतेचे द्योतक मानला जात आहे.त्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या लोकसेवेचा मोठा ठसा जनमानसावर आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे तरूण नेतृत्व
पंजाब व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत, १००० पेक्षा अधिक घरांमध्ये कोविड किटचे वितरण आणि शिक्षकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस आरोग्य योजना राबवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच धन्वंतरी ज्ञानाई दिंडीच्या माध्यमातून पंढरपूर दिंडी मार्गावर हजारो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली आहे. सेलू शहरासाठी आरोग्य वाहिनीद्वारे हेल्थ ऑडिट, २५०० पेक्षा अधिक नागरिकांना हेल्थ कार्ड आणि उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी व डायलिसिस युनिट उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला आहे. महिला व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिबिरे, माता सुरक्षित तर घर सुरक्षित उपक्रम आणि महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान असे उपक्रम राबवले.
लोकोपयोगी उपक्रम
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली. प्रशासकीय स्तरावर घरपट्टीवरील शास्ती कमी करण्यासाठी अभय योजना राबवण्यावर त्यांनी भर दिला. भविष्यात मूलभूत नागरी सुविधा सक्षम करणे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि डिजिटल व पारदर्शक प्रशासन देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. लोकसहभागातून विकास ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. डॉ. अनिकेत जोगदंड यांचा विजय हा कार्यक्षम नेतृत्वाला मिळालेली जनतेची पावती असून शहराच्या विकासात त्यांची भूमिका निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





