शंतनु महाराज पाठक यांचे प्रतिपादन, सेलूत संत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त भव्य कीर्तन सोहळा उत्साहात
संत हेच विश्वाचे माऊली आणि शिस्तप्रिय पिता : शंतनु महाराज

सेलू : संत तुकाराम महाराजांच्या “तुम्ही संत माय, बाप कृपावंत” या अभंगाचे निरूपण करताना प्रसिद्ध कीर्तनकार शंतनु महाराज पाठक वालूरकर यांनी सांगितले की, संत हे आईप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करतात आणि वडिलांप्रमाणे शिस्त लावून समाजाचा उद्धार करतात. संत ज्ञानेश्वरांनी जडाचा, जीवाचा आणि जनाचा उद्धार करण्यासाठी भिंत चालवली, रेडा बोलवला आणि ज्ञानेश्वरी रचली. आई ज्याप्रमाणे लेकराचे हित जाणते, तसाच निरपेक्ष कळवळा संतांकडे असतो. संत हे केवळ माऊलीच नव्हे, तर भक्तांना सन्मार्गावर आणणारे शिस्तप्रिय पिताही आहेत. त्याप्रमाणेच चारित्र्य, ऐश्वयसंपन्न आणि आदर्श समाजसुधारक म्हणून संत भगवान बाबा यांनी आपले आयुष्य तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी वेचले, असे शंतनु महाराज म्हणाले.
श्री संत भगवान बाबा यांच्या ६१ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सेलू येथील श्रीराम कॉलनीमध्ये संत भगवान बाबा सेवा मंडळांच्या वतीने रविवारी, ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित कीर्तन महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. महाराज म्हणाले, की संत जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असतात. त्यांनी तुकाराम महाराज आणि एका व्यापाऱ्याचा दृष्टांत देत स्पष्ट केले की, संसारातील कामे करत असतानाही नामस्मरण कसे करता येते, याचे सोपे उपाय केवळ संतच शोधू शकतात. संतांच्या ‘पितृत्व’ आणि ‘अनुशासना’बद्दल बोलताना महाराज म्हणाले की, जसा पिता मुलाच्या चुकीच्या वागण्यावर अंकुश ठेवतो, तद्वतच संतांनी आपल्या वाङ्मयातून समाजातील दोषांवर प्रहार केला आहे. संतांची ‘शिवी’ ही सुद्धा समाजासाठी उद्धारक ‘ओवी’च ठरली आहे. देव भक्ताचा अधिकार पाहून कृपा करतो, परंतु संत कोणताही अधिकार न पाहता सर्वांवर कृपेचा वर्षाव करतात, असेही त्यांनी नमूद केले.
माणुसकीच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी हाच एकमेव मार्ग
“जगातील सर्व दुःख आणि अज्ञानाचा अंधकार दूर करायचा असेल, तर ज्ञानेश्वरीचे वाचन आणि पारायण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे,” असे आग्रही मत शंतनु महाराज पाठक यांनी व्यक्त केले.
कीर्तनादरम्यान महाराजांनी भाविकांना कळकळीची विनंती केली की, प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. ज्यांना वाचता येत नाही, त्यांनीही श्रद्धेने ग्रंथावर बोट फिरवून पारायणाला बसावे. “जसा आपण मोबाईल बघतो, तशीच ज्ञानेश्वरी हृदयात धरून वाचा, ती कोणत्याही स्वरूपात तुमचे कल्याणच करेल,” असे ते म्हणाले. वालूर येथील १२० वृद्ध महिलांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, केवळ बोट फिरवून ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांनाही आता अक्षरे कळू लागली आहेत, हा ग्रंथाचा मोठा महिमा आहे. माणुसकीच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी हाच एकमेव मार्ग, असे महाराज म्हणाले.
संत भगवान बाबा सेवा मंडळाच्या वतीने पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनानंतर महाआरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतला. या सोहळ्यास नगराध्यक्ष मिलिंद सावंत, नगरसेवक साईराज बोराडे आदींसह मान्यवर; तसेच, सेलू शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संत भगवान बाबा सेवा मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, सेवेकेरी आणि श्रीराम कॉलनीवासियांनी पुढाकार घेतला.
फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभागाचे आवाहन
कीर्तनाच्या शेवटी शंतनु महाराजांनी उपस्थित भाविकांना सांप्रदायिक आचरण ठेवण्याचे आवाहन केले. वारकरी वेशभूषा, धोतर आणि शिस्तबद्ध भजन यातूनच आपली संस्कृती टिकून राहील, असे ते म्हणाले. सेलूतील सर्वोदय नगर येथे सुरू असलेल्या पारायण सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, तसेच १२ ते १९ मार्च या कालावधीत फिरता श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची महाभारत कथा सेलू शहरात आयोजित करण्यात आली आहे. या वेळी घरातील किमान दोघांनी तरी श्री ज्ञानेश्वरी पारायणाच्या दिव्य सोहळ्यात पारायणाला बसावे, असे आवाहनही शंतनु महाराज यांनी केले.





