कुलगुरू प्रा. इन्द्र मणि यांचे प्रतिपादन : वनामकृवित ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त सद्भावना सोहळा उत्साहात
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शीख धर्माचे नववे गुरु हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त सद्भावना सोहळ्याचे दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत श्रद्धा, आदर व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व उद्घाटन कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख वक्ते म्हणून वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डॉ. बालाजी चिरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. कैलास गाढे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी व धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करून संपूर्ण जगाला सहिष्णुतेचा, सत्याचा व त्यागाचा मार्ग दाखविला आहे. पुढे कुलगुरूंनी म्हणाले की, देशाने तसेच महाराष्ट्राने घडवून आणलेल्या महापुरुषांचा इतिहास, त्यांचे बलिदान, कार्य व त्याग सर्वांना माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आपण आज ज्या देशात सुखाने व शांततेत राहतो, त्यामागे साडेतीनशे–चारशे वर्षांपूर्वीचा संघर्षमय इतिहास दडलेला आहे, जो आज आपण जाणून घेत आहोत.
भारत ही संत, थोर महापुरुष आणि वीर योद्ध्यांची भूमी आहे. या योद्ध्यांनी भारताचे अनेक पातळ्यांवर रक्षण केले आहे. त्यामधील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी केले. भारताची अब्रू वाचवण्यासाठी त्यांनी अतुलनीय बलिदान दिले. म्हणूनच त्यांना ‘हिंद की चादर’ असे सन्मानपूर्वक संबोधले जाते.
जर श्री गुरु गोविंद सिंगजी, गुरु तेग बहादुर साहिबजी, यांच्यासारखी महान व्यक्तिमत्त्वे नसती, तर परकीय आक्रमणे व अत्याचार थांबले नसते. त्या काळात भारताकडे सोन्याची खाण म्हणून पाहिले जात होते आणि लूट करण्याच्या उद्देशाने बाहेरून आक्रमणे होत होती. या आक्रमणांना थोपवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सिंध व पंजाब प्रांतातून होत असे आणि तेथील योद्धे समर्थपणे लढून आक्रमकांना रोखत होते. “जो लढता है, वो मजबूत होता है,” असे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यामुळेच पंजाबी व्यक्तिमत्त्व बलवान वाटते. हे आक्रमक लुटारू धन, अब्रू आणि सर्वस्व लुटण्याचा प्रयत्न करत होते. अशा परिस्थितीत हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी हे सर्व थांबवण्यासाठी अद्वितीय योगदान दिले. स्वतःवर संकट नसतानाही, काश्मीरमधील सुमारे ५०० पंडितांचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा, धनाचा व कुटुंबाचा त्याग केला. त्यामुळेच ते आज अजरामर झाले आहेत. त्यागातूनच खरी कीर्ती मिळते, याचे हे मोठे उदाहरण आहे.
यांचाच आदर्श घेऊन आपण त्यागी जीवन जगावे. आपल्या जवळ असलेल्या धन, ताकद आणि विद्या यांचा समतोल उपयोग करून आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, असे माननीय कुलागुरुनी सांगितले. कारण लोक व्यक्तीला नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाला ओळखतात. महापुरुषांचे जीवन हे त्यागाचे प्रतीक आहे. जीवनात अडचणी आल्यास किंवा वाईट विचार मनात आल्यास, महापुरुषांचा इतिहास आठवावा, त्यागाची भावना निर्माण करावी, संयम ठेवावा, धैर्य बाळगावे, आपुलकी व सद्भावना जपावी आणि कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या विचारांचे अनुकरण करून आपले जीवन घडवावे, असे सांगून त्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्याचे मूल्य आपल्या जीवनात अधिकाधिक उतरवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा करावी, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी मानवतेच्या संरक्षणासाठी तसेच धर्मरक्षणासाठी केलेल्या महान कार्याचा उल्लेख केला. त्यांना बालपणापासूनच मातोश्रींकडून धर्मरक्षणाचे संस्कार मिळाले होते. त्यांनी अन्यायाविरुद्ध ठामपणे प्रतिकार केला व शीख धर्माचे नवे गुरुपद स्वीकारले. त्यांच्याकडे युद्धकौशल्यासह क्षमा, प्रेम आणि करुणा यांसारखे उच्च मानवी गुण होते. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता त्यांनी धर्मासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. या सर्व महान कार्यांमुळेच आज संपूर्ण देश त्यांना हिंद की चादर म्हणून ओळखतो. या निमित्ताने विद्यापीठामार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते डॉ. बालाजी चिरडे यांनी आपल्या व्याख्यानात हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत सांगितले की, त्यांच्या बलिदानामुळे भारतात धार्मिक स्वातंत्र्याची परंपरा अधिक दृढ झाली असून आजच्या पिढीने त्यातून मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा घ्यावी. यावेळी त्यांनी हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जन्मापासून ते हुतात्म्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास सविस्तरपणे मांडला. आज त्यांच्या हुतात्म्यास साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी, महाराष्ट्र तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी सर्वप्रथम औरंगजेबाची भूमिका व त्याची धोरणे समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाने राबविलेल्या जबरदस्तीच्या धर्मांतराच्या धोरणातील सर्व बाबी त्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या.
इ.स. १६६४ मध्ये हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे शीख धर्माचे नववे गुरु झाले. त्यांना केवळ दहा वर्षांचा कार्यकाळ लाभला; मात्र या काळात त्यांनी उत्तर भारतापासून अफगाणिस्तानपर्यंत व्यापक प्रवास केला. औरंगजेबाने सर्वांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याअंतर्गत सर्वप्रथम ५०० काश्मिरी पंडितांना धर्मांतरासाठी बोलावण्यात आले. या पीडित पंडितांनी हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी औरंगजेबाला वकिलामार्फत असा संदेश पाठविला की, प्रथम माझे धर्मांतर करा, त्यानंतर या पंडितांचे करा.
औरंगजेबाला हे कार्य सोपे वाटले; मात्र हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी कोणत्याही प्रलोभनाला, दबावाला किंवा दहशतीला बळी न पडता आपल्या धर्मावर ठाम राहिले. अखेरीस त्यांनी धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांचा त्याग केला आणि हुतात्म्याचे बलिदान स्वीकारले. भारतीय इतिहासात हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे अनन्यसाधारण महत्त्व असून ते देशातील महान योद्ध्यांपैकी एक होते. अशा महान हुतात्म्यांचा इतिहास आपण सर्वांनी जाणून घेणे आवश्यक असल्याचे श्री. चिरडे यांनी अधोरेखित केले. प्रास्ताविकात डॉ. प्रवीण वैद्य यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा खरा इतिहास समाजासमोर मांडणे तसेच त्यांनी केलेल्या धर्मरक्षणाच्या कार्याची ओळख सर्वांपर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. डॉ. रणजीत चव्हाण यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर व डॉ. फारिया खान यांनी केले तर आभार जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर रावसाहेब भाग्यवंत यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बालपण, शिक्षण, त्याग, बलिदान व सामाजिक योगदानावर आधारित माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यातून धार्मिक सहिष्णुता, मानवता, त्याग व नैतिक मूल्यांचे महत्त्व समजून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, देशप्रेम व मानवतावादी दृष्टिकोन वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.





