पाथरी येथील प्राणघातक हल्ला प्रकरण : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; आरोपीला अटक करण्याची नागरिकांची मागणी
परभणी : महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पाथरी येथील एका घटनेमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शासकीय परिसरात एका कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले, तरी मुख्य आरोपी अद्याप मोकळाच फिरत आहे. पाथरी पोलिसांच्या या भूमिकेमुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी शारेफ खान रफिकखान पठाण हे पाथरी नगर परिषदेत अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ते आपल्या सहकाऱ्यासोबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते. याच वेळी आरोपी हबीबखान हमीदखान पठाण याने तिथे येऊन जुन्या वादातून फिर्यादीच्या सहकाऱ्याशी हुज्जत घातली.वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि आरोपीने जिवे मारण्याची धमकी देऊन खुर्रमखान पठाण यांच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात खुर्रमखान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पाथरी शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, इतका गंभीर गुन्हा घडूनही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. शासकीय परिसरात असा हल्ला होणे आणि आरोपी अद्याप न पकडला जाणे, हे पाथरी पोलिसांचे मोठे अपयश मानले जात आहे. जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसेल, तर सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.





