जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन
परभणी : भारतीय लोकशाही प्रक्रियेचा कणा मानल्या जाणाऱ्या मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रात हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता असून, यासाठी प्रशासन सज्ज आहे. परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात २४ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार व पत्रकार उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ नोंदणीपुरता मर्यादित नसून, स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठीचे पाऊल आहे. या अंतर्गत दुबार नावे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नोंद वगळली जाणार आहे. तसेच अपूर्ण किंवा अस्पष्ट छायाचित्रे दुरुस्त करून पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जातील. एकही पात्र मतदार वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांचे मॅपिंग करण्याची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये सन २००२ च्या अंतिम मतदार यादीतील मतदारांचे सन २०२५ च्या मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग केले जात आहे. परभणी जिल्ह्यात मॅपिंगचे काम ६६.०५ टक्के झाले असून, जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात पाथरी उपविभाग प्रथम क्रमांकावर असून सोनपेठ तहसीलचे काम सर्वाधिक ७८.०० टक्के झाले आहे.या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील ४ मतदार नोंदणी अधिकारी, ९ सहायक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षण अधिकारी आणि निवडणूक नायब तहसीलदार यांच्यासह १६३ पर्यवेक्षकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच १६२३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) तहसील स्तरावर प्रशिक्षित करण्यात आले आहे. राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिनिधी नेमण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.निवडणूक आयोगाने बीएलओ ॲपमध्ये मतदारांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आगामी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने जागरूक राहून आपले नाव तपासावे व मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी नागरिकांना २००२ च्या मतदार यादीतील नावे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे किंवा संबंधित बीएलओ आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.





