खासदार संजय जाधव यांची रेल्वेमंत्र्यांशी भेट
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी बुधवारी (दि. १) दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी आणि प्रवाशांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मागण्यांचे विस्तृत निवेदन सादर केले.
खासदार जाधव यांनी मराठवाड्याला देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने नांदेड-जोधपूर आणि जैसलमेरसाठी जालना-मनमाड-जळगाव मार्गे नवीन ट्रेन सुरू करणे, पूर्णा-पटना, नांदेड-रायचूर आणि बेंगळुरू-नांदेड एक्सप्रेसचा जालनापर्यंत विस्तार करणे, तसेच मिरज-परळी पॅसेंजर पूर्णा जंक्शनपर्यंत वाढवण्याच्या मागणीचा समावेश आहे. याशिवाय नांदेड-गंगानगर एक्सप्रेसची वारंवारिता वाढवून ती आठवड्यातून तीनदा करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
विविध स्थानकांवर थांबा, डब्यांमध्ये वाढ करावी
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेसला गंगाखेड, तर नांदेड-पुणे आणि नंदीग्राम एक्सप्रेसला मानवत रोड स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. परतूर स्थानकावर सच्चखंड एक्सप्रेस व नगरसोल-नरसापूर ट्रेनला थांबा मिळावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मांडली. रेल्वेतील गर्दी लक्षात घेऊन पुणे-अमरावती, कोल्हापूर-धनबाद आणि निजामाबाद-पंढरपूर पॅसेंजरमध्ये जास्तीचे आरक्षित कोच जोडण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.
पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था
परभणी जंक्शनच्या विकासासाठी दोन नवीन प्लॅटफॉर्म आणि नवीन पिटलाइन उभारणे, तसेच परभणी-छत्रपती संभाजीनगर मार्गाचे दुहेरीकरण जलदगतीने पूर्ण करण्यावर खासदार जाधव यांनी भर दिला. रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेसाठी परभणी जंक्शनवर अतिरिक्त आरपीएफ आणि जीआरपी जवानांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. तसेच रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची पुरेशी तैनाती असावी, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष गाड्यांचे नियोजन
एप्रिल ते जून या कालावधीत वाढणारी प्रवाशांची संख्या पाहता, मुंबई, नाशिक, मडगाव, अहमदाबाद, कोल्हापूर आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांसाठी मराठवाड्यातून समर स्पेशल ट्रेन चालवण्याची विनंती त्यांनी केली. यामध्ये प्रामुख्याने परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथून विशेष गाड्या सोडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.





