श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रतिपादन, वसंत प्रतिष्ठानची प्रवचनमाला

सेलू : ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात वैश्विक कल्याणाचा जागर घातला असून विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेले हे मागणं मानवी जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.
येथील वसंत प्रतिष्ठान, श्री केशवराव बाबासाहेब शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर, ॲड.उमेश खारकर आणि परिवाराच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर हे मागील सहा वर्षांपासून पसायदानातील ओव्यांचे अत्यंत रसाळ आणि चिंतनशील सखोल निरुपण करित आहेत. यावर्षी “किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिन्ही लोकी, भजिजो आदीपुरुखी, अखंडित” या ओवीवर ते मार्गदर्शन करीत आहेत.
तीन दिवस साईबाबा मंदिरात दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत आयोजित प्रवचनाला गुरुवारी, २ एप्रिल रोजी उत्साहात सुरूवात झाली.
सुखी जीवनाचे सार
पसायदानातील ‘ किंबहुना ‘ या शब्दाची योजना आणि सविस्तर अर्थ श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी प्रवचनात सांगितला. तत्पूर्वी महाराजांनी मागील सहा ओव्यांचे संक्षिप्त चिंतन मांडले. सुखी जीवनाचे गुपित उलगडले. ते म्हणाले की, या जगात प्रत्येक माणसाला आपण सुखी व्हावे असे वाटते, मात्र विवेकाशिवाय ते सुख टिकणे कठीण आहे. समर्थ रामदासांनी विचारल्याप्रमाणे ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ याचे उत्तर शोधताना त्यांनी सांगितले की, ज्याच्याकडे ज्ञान, विवेक आणि विचार आहे तोच मनुष्य खऱ्या अर्थाने सुखी असू शकतो. ज्ञानेश्वरीतील दाखला देताना त्यांनी स्पष्ट केले की, ज्याच्या ठायी ज्ञानाची आवड नाही, त्याचे जगणे व्यर्थ आहे. मानवी जीवनाचे वेगळेपण हे केवळ ज्ञान, भक्ती आणि सत्कर्मात आहे.
दुष्ट प्रवृत्तीचा त्याग; सत्कर्माची रती
पसायदानातील “जे खळांची व्यंकटी सांडो” या ओवीवर चिंतन मांडताना महाराजांनी स्पष्ट केले की, माऊलींनी येथे व्यक्तीचा नव्हे, तर त्याच्यातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा असे मागितले आहे. माणसाच्या मनातील वाकडेपणा किंवा खलत्व दूर झाले की, त्याच्या ठायी सत्कर्माची रती म्हणजे आवड निर्माण होते. जेव्हा बुद्धीतील दोष दूर होतात, तेव्हाच मनुष्य खऱ्या अर्थाने ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा जावा आणि त्यांना सत्कर्माची ओढ लागावी, हाच यामागचा उदात्त विचार आहे.
जीवाचे मैत्र आणि वैश्विक मैत्रीची भावना
“भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे ” या ओवीचा अर्थ उलगडताना देगलूरकर महाराजांनी सांगितले की, माणसाने केवळ माणसाशीच नव्हे, तर चराचरातील प्रत्येक जीवाशी मैत्रीचे नाते जोडले पाहिजे. हे मैत्र केवळ वरवरचे किंवा उपचारापुरते नसून ते अंतःकरणापासून म्हणजे ‘जीवाचे’ असावे. विश्वातील प्रत्येक घटकामध्ये परमेश्वराचे रूप पाहण्याची दृष्टी पसायदानातून मिळते. जगातील कोणत्याही भाषेत पसायदानापेक्षा अधिक व्यापक विचार कोणीही मांडू शकलेला नाही.
कर्मनिष्ठा आणि ज्ञानाधिष्ठित भक्ती महत्त्वाची
माणसाने ‘कर्मठ’ नसून ‘कर्मनिष्ठ’ असावे, असा मोलाचा संदेश महाराजांनी दिला. कर्माला जेव्हा ज्ञानाचे डोळे प्राप्त होतात, तेव्हाच ते कर्म निर्दोष आणि फलदायी ठरते. भक्तीच्या मुळाशी ज्ञानाचा विचार असेल तरच ती भक्ती व्यापक बनते आणि त्यामध्ये परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य येते. देवाला न जाणता केलेली भक्ती ही केवळ अंधश्रद्धा ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
आनंदाच्या राशीवर बसण्याचा अनुभव
पसायदान हे केवळ शब्दांचे मागणं नसून, तो परमानंदाचा अनुभव आहे. “किंबहुना सर्व सुखी” या ओवीद्वारे संपूर्ण सृष्टी आनंदाच्या राशीवर बसावी, अशी अपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केली आहे. जेव्हा मनुष्य आपल्या अहंकाराचा त्याग करून सद्गुरूंच्या चरणी लीन होतो, तेव्हाच त्याला हा अक्षय आनंद प्राप्त होऊ शकतो.

प्रारंभी दीपप्रज्वलन आणि माऊली ज्ञानेश्वर, स्व.वसंतराव खारकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. महेश खारकर आणि ॲड.उमेश खारकर यांनी सद्गुरू पूजन केले. सखाराम उमरीकर यांनी अभंग गायन केले. त्यांना हार्मोनियमवर शंतनु पाठक, तबला गिरीश दीक्षित, बासरी अर्जुन कसाब आदींनी साथसंगत दिली. प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले. शरण्या मोहकरे, मनवा देशमुख, आरोही ओगले, यथार्थ गौलवाड यांनी पसायदान गायले. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. प्रवचनास सेलू व परिसरातील भाविक, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ४ एप्रिल रोजी या ज्ञानयज्ञाची सांगता आहे.

वृत्तसंकलन : बाबासाहेब हेलसकर





