रायपूरचे ग्रामस्थ आक्रमक, सेलू गटशिक्षणाधिकारी कार्यालयात वर्ग भरवण्याचा इशारा
सेलू : सेलू तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक माधव गव्हाणे यांची झालेली बदली तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे. ही बदली रद्द न झाल्यास जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ग थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरवले जातील, असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या संदर्भातील मागणीचे निवेदन शुक्रवारी, १९ जून २०२६ रोजी गावकऱ्यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आले. तसेच या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.मौजे रायपूर येथील आदर्श शिक्षक श्री.गव्हाणे यांची ३० सप्टेंबर २०२५ च्या पटसंख्येचा आधार घेऊन अतिरिक्त ठरवून बदली करण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत आजरोजी शाळेतील वरच्या वर्ग ६, ७ आणि ८ वी ची एकूण पटसंख्या ७५ पेक्षा जास्त आहे. नियमानुसार रायपूर येथील शाळेत तीन पदे असणे आवश्यक असताना, सध्या केवळ दोनच शिक्षकांवर संपूर्ण भार आला आहे. श्री.गव्हाणे यांच्यामुळेच शाळेतील विद्यार्थी संख्या टिकून असून त्यांच्या या बदलीमुळे सर्व गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन गव्हाणे यांच्या बदलीचा आदेश लवकरात लवकर रद्द करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. आदेश रद्द न केल्यास २३ जून २०२६, मंगळवार रोजीपासून थेट गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच शाळेचे वर्ग भरवण्यात येतील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर रामेश्वर गाडेकर, रामेश्वर शंकरराव गाडेकर, दादासाहेब गाडेकर, लक्ष्मण गाडेकर, माणिक काजळे, वैभव गाडेकर, अंकुशराव गाडेकर, शिवाजी हिंगे, विकास हिंगे, राजेश गाडेकर यांच्यासह अनेक अर्जदार व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





