गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव; विविध पारितोषिकांचे वितरण
सेलू : परभणी जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या शाळांपैकी एक असलेल्या वालूरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेत शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मुख्याध्यापक एस.एस.देशमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्ताने शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वतंत्र भारतापुढे उभी असलेली आव्हाने, नागरिकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यावर प्रकाश टाकत आपण एक आदर्श नागरिक बनले पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली. वालूरचे भूमिपुत्र सुनीलराव भोकरे (IAS), माजी केंद्रप्रमुख दत्तात्रय रोकडे, सुरेश गायकवाड, शिक्षणप्रेमी रामेश्वर पाथरकर, दत्तात्रय चौधरी, कैलास सोनवणे, सई ब्युटी पार्लर वालूर, नानासाहेब पवार, गोपीनाथ इखे या मान्यवरांनी मागील वर्षी इयत्ता १० वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच चालू शैक्षणिक वर्षातील विविध परीक्षांमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात आणि वस्तू स्वरूपातील पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी मेहनत घेतली





