पिक विम्यातून कुपटा, मोरेगाव, चिकलठाणा आणि वालूर ही महसूल मंडळे वगळण्यात आल्याचा निषेध
सेलू (जि. परभणी) : खरीप २०२५ च्या पिक विम्यातून कुपटा, मोरेगाव, चिकलठाणा आणि वालूर ही महसूल मंडळे वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी तालुका कृषी अधिकारी सेलू यांना दिलेल्या निवेदनातून मागणी मान्य न झाल्यास २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की मागील २०२५ मध्ये या भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली होती. दुधना, कसूरा नदी आणि करपरावर नाल्याच्या लगत असलेल्या शेतांमधील पिके वाहून गेली असून जमिनी खरडून निघाल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असतानाही कुपटा, वालूर, मोरेगाव आणि चिकलठाणा ही मंडळे विम्यातून वगळली गेल्याची माहिती समोर आली आहे.
ही सर्व गावे नदी पात्राच्या लगतची आहेत. कापणी प्रयोगाचा संयुक्त अहवाल तयार करताना गटविकास अधिकारी, महसूल विभाग, कृषी विभाग आणि विमा प्रतिनिधींच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन वरील मंडळांचा समावेश करून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी कृषी कार्यालयात बेमुदत ठिय्या मांडतील. यावेळी जयसिंग शेळके, दगडोबा जोगदंड महाराज, शिवहरी शेवाळे, विजय काष्टे, उद्धवराव मोरे, महेश नावडे, गोपीनाथ सोळंके, कंस मानमोडे, दिगंबर बुधवंत, रमेश शिंदे, जगन शिंदे, सुनील मुळे, प्रल्हाद तुरे, काशिनाथ सोळंके, भीमराव हरके, मंचक सोळंके, विष्णूपंत सोळंके, सुनील गायकवाड, विशाल गायकवाड व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




