प्रा.डॉ.संगीता आवचार यांचे मत, मुलींनी इंटरनेट; सोशल मीडिया वापरताना सतर्क राहाण्याचे आवाहन

सेलू : एआयच्या युगात मोबाइलद्वारे आपल्या प्रत्येक हालचालीवर तंत्रज्ञानाद्वारे लक्ष ठेवले जात आहे. यासाठी आपल्या भारतीय संस्कृती आणि विज्ञानाचा आधार घेत सर्वांनीच विशेषतः महिला आणि मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे काळाची गरज आहे, असे मत परभणी येथील कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.संगीता आवचार यांनी व्यक्त केले.
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि महिला मंडळाच्या संयुक्त सहकार्याने श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती वर्ष आणि महिला दिनानिमित्त शुक्रवारी, २७ मार्च रोजी आयोजित व्याख्यानात डॉ.आवचार बोलत होत्या. ” समाज माध्यमांमुळे महिलांची सुरक्षितता आणि समाज व्यवस्था धोक्यात आली आहे ? ‘ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया होते. व्यासपीठावर सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर यांची उपस्थिती होती.
प्राध्यापक आवचार म्हणाल्या, की आजच्या काळात मुली सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात आणि स्वतःचे फोटो किंवा माहिती पोस्ट करतात. परंतु अशा वेळी दुसऱ्या बाजूला काही विघातक प्रवृत्ती दबा धरून बसलेल्या असतात. आपल्या एका चुकीच्या कृतीमुळे आपला वैयक्तिक डेटा आणि संपर्क क्रमांक या लोकां पर्यंत पोहोचू शकतो ज्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते असे त्यांनी स्पष्ट केले. एआयच्या युगात आपल्या प्रत्येक हालचालीवर तंत्रज्ञानाद्वारे लक्ष ठेवले जात आहे.
काय सर्च करतोय याचे भान ठेवा :
आपण गुगलवर जे काही शोधतो किंवा सर्च करतो त्याचा डेटा संकलित केला जातो आणि त्यानुसार आपल्याला जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे मुलींनी इंटरनेटचा वापर करताना आपण काय सर्च करत आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. चुकीचा किंवा अश्लील मजकूर सर्च केल्यास तशाच प्रकारचे साहित्य समोर येत राहते जे मानसिकतेवर परिणाम करू शकते असेही डॉ.आवचार यांनी सांगितले.
धोक्याची घंटा : मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापराबाबत धोक्याचा इशारा देताना त्यांनी सांगितले की अनेक जण २४ तास इंटरनेट सुरू ठेवतात. झोपताना मोबाईल उशाशी घेऊन झोपण्याची सवय अत्यंत घातक आहे. विज्ञानानुसार मोबाईल झोपताना स्वतःपासून किमान १० फूट अंतरावर असायला हवा. आपण मोबाईलला इतके जवळ केले आहे की भविष्यात आपण जे विचार करू ते सुद्धा एआय द्वारे ओळखून आपल्याला पुरवले जाईल अशी स्थिती निर्माण होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पालकांनी आणि मुलींनी या तांत्रिक फसवणुकीपासून सावध राहावे आणि कोणतीही अडचण आल्यास वेळीच संवाद साधावा, असे आवाहन केले. मोबाईल आपल्यासाठी आहे;आपण त्यासाठी नाहीत, याची जाणीव ठेवून महिलांनी समाज माध्यमातून त्यांना त्रास देणाऱ्या आक्षेपार्ह संदेशा संदर्भात निर्भयपणे व्यक्त व्हावे. एक दिवस मोबाईलचा उपवास करावा. असेही डॉ.संगीता आवचार म्हणाल्या.
यावेळी सचिव ललिता गिल्डा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रणिता सोलापूरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन हेमलता देशमुख यांनी केले. तर संयोजक मुख्याध्यापक निशा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सदस्य अजीज खा पठाण, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.सुभाष बीराजदार, करूणा बागले, वसुधा खारकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.





